Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News : निवडणुकीची घोषणा होताच CM शिंदेंचा मोठा दावा; म्हणाले,'आमचं सरकार पूर्ण बहुमतानं...'

Deepak Kulkarni

Mumbai News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी (ता.15) पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या घोषणा केली.

त्यानंतर जागावाटपासह इतर राजकीय घडामोडींना राज्यात वेग आला आहे. तसेच आता सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून निकालाबाबत वेगवेगळे दावे केले जात आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही मोठं विधान केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Election) निवडणुकीवर थेट भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवतानाच महायुती सरकारच्या सव्वा दोन वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा लेखाजोखाच मांडला.

शिंदे म्हणाले, 20 नोव्हेंबर हा मतदानाचा दिवस महाराष्ट्राचा भाग्य ठरवणारा दिवस आहे. गेल्या दोन सव्वादोन वर्षांमध्ये या महाराष्ट्रात महायुतीने केलेले काम आणि सुरू केलेल्या कल्याणकारी योजना या जनतेसमोर आहेत. लाडक्या बहिणींपासून ज्येष्ठांपर्यंत,शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य माणसांपर्यंत सर्वजण सत्तेचे वाटेकरी आहेत असल्याचंही त्यांनी सांगितले.

ही सत्ता सर्वसामान्य लोकांची आहे. या सत्तेमध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वाटेकरी बनुन आम्ही या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. महाराष्ट्र हे प्रगतीकडे चाललेला आहे, महाराष्ट्र सर्व सुविधांमध्ये नंबर एक आहे. कल्याणकारी योजनांमध्ये नंबर एक आहे, याचा फलित येणाऱ्या निवडणुकीत होणाऱ्या मतदानाच्या लोकशाहीच्या मोठ्या उत्सवात दिसेल असंही मुख्यमंत्री म्हणाले.

महाविकास आघाडीचं आणि आमच्या सरकारच्या कामाचं मोजमाप नक्कीच होईल. कधी न झालेला विकास आम्ही केलेला आहे. याची पोचपावती या महाराष्ट्रात जनता दिल्याशिवाय राहणार नाही. महायुतीचं सरकार पूर्ण बहुमताने या निवडणुकीत येईल असा विश्वासही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी आम्ही टीम म्हणून काम करतोय, मी कॉमन मॅन म्हणून काम करतोय, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करणाऱ्या सरकार आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे. महायुती प्रचंड मताधिक्क्याने विजयी होईल, याचा पुनरुच्चारही केला.

विरोधक जेव्हा जिंकतात, तेव्हा ईव्हीएम चांगली असते, निवडणूक आयोग चांगलं असतं, न्यायालय चांगल असतं आणि जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतात तेव्हा निवडणूक आयोग, ईव्हीएम सगळं खराब असतं असा टोलाही त्यांनी लगावला.

हरियाणामध्ये जेव्हा काँग्रेस पुढे चालली होती, तेव्हा पेढे आणि जिलेबी वाटत होते,लड्डू फुटत होते आणि जसा त्यांचा निकाल लागला तेव्हा त्यांचे ढोल फुटले. मग ईव्हीएम खराब झालं, निवडणूक आयोग खराब झाला, ही दुटप्पी भूमिका सारखा विरोधी पक्ष घेतोय. हे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे, हा केविलवाणा त्यांचा प्रयत्न आहे. आम्ही निवडणुकांना सामोरे मजबुतीने, ताकदीने आणि विकासाच्या जोरावर सामोरे जातोय असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT