Balasaheb Thorat 1 Sarkarnama
मुंबई

Balasaheb Thorat : कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, तर जमिनी जिरवण्यासाठी गुप्त बैठका; थोरातांनी फडणवीस आणि विखेंचं सर्वच काढलं

Pradeep Pendhare

Mumbai News : काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुंबईतील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर सरकारचे धिंडवडे, तर या सरकारने मंत्रालयाचा भ्रष्टाचाराचा अड्डा बनवल्याचा घाणाघात केला.

बाळासाहेब थोरातांनी, अशी टीका करून अप्रत्यक्षपणे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर निशाणा साधला. या सरकारच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रातील जमिनी देखील सुरक्षित राहिल्या नाहीत, त्या जिरवण्यासाठी गुप्त बैठका सुरू आहेत, असा गंभीर थोरातांनी केला.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, "शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर राज्यात एक घोषणा गाजली होती. '50 खोके, एकदम ओके'. ही घोषणा आजही गावकडच्या पारांवर घुमते आहे. या सरकारची आजही तिच अवस्था आहे. बेकायदेशीर आणि राजकीय नैतिकदृष्ट्या सत्तेत येण्यासाठी भाजपने केलेले फोडफोडीचे राजकारण जनतेला आवडलेले नाही. जनता विसरलेली नाही. खरी राष्ट्रवादी आणि शिवसेना कोण? हे लोकसभेला जनतेने दाखवून दिले आहे".

भ्रष्टाचाराचे, बेकायदेशीर सरकारामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी भाजप (BJP) नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. "आमदार पोलिस ठाण्यात गोळीबार करतो. अमली पदार्थांचा हैदोस सुरू आहे. धन-दांडग्यांची पोरं गोरगरिबांवर गाड्या घालतात. त्यांना वाचवण्यासाठी हे सत्ताधारी जात आहेत. बदल्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. निवडणुकीसाठी पैसा उभा करण्याचा काम सुरू आहे. अतिरेक झालं आहे. या सर्व भ्रष्टाचाराचे केंद्र मंत्रालय बनले आहे", असा घाणाघात बाळासाहेब थोरात यांनी केला.

बाळासाहेब थोरातांनी महायुती सरकारमधील जमीन व्यवहारावर भाष्य करत, जमिनीचे सर्व उद्योग कशासाठी सुरू आहे, हे जनतेला कळून चुकले आहे. कुर्ला येथील बहुमोल जागा देऊन टाकली. या जागेटा ठराव मंत्रालयात सापडत नाही. चारओळी काहीतरी लिहून ठेवल्या असून, ती जमीन परत घेण्याची व्यवस्था सरकारने केलेली दिसत नाही. वरळीमधील आरेची जमीन देखील जिवरण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी गुप्त बैठका होत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी पैसा उभा करण्याचा घाट या बेकायदेशीर सरकारने घातला असून, त्यासाठी लाडकी बहिणीच्या नावाखाली लाडकी सत्ता हा उद्योग सुरू असल्याचा टोला लगावत सरकार बदलणे हाच यावर उपाय असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

अहंकार, घमेंड महाराष्ट्रानं उतरवली

महायुती सरकारवर आरोप करावं तेवढे थोडं आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश महाराष्ट्राने दिले. देशाला संदेश देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. लोकशाही, संविधानावर जेव्हा आघात होतो, त्यावेळी जनता कशी पेटून उठते, ते महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलं आहे. कोणाला अहंकार, कोणाला गर्व झाला आहे, कोणी घमेंडी बनलं असले, त्यापद्धतीने सत्तेचा वापर कोणी करत असले, ती घमेंड जिरवण्याची ताकद जनतेमध्ये आहे. त्याचं नेतृत्व महाराष्ट्र करत आहे, हे देशाने पाहिले. स्वायत्त संस्था गुलाम करून ठेवल्या आहेत. राजकारणासाठी त्यांचा वापर होतोय. जनतेला ते मान्य नाही. ज्यापद्धतीने भाजप सत्तेचा वापर केला, त्याचे उत्तर जनतेने दिलं असून, त्यात महाराष्ट्राची जनता पुढे होती, याचे देशात कौतुक होत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT