Sharad Pawar, Nana Patole
Sharad Pawar, Nana Patole Sarkarnama
मुंबई

आम्ही बारामतीमध्ये गेलो तर...! नाना पटोलेंचं शरद पवारांना आव्हान

सरकारनामा ब्युरो

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विदर्भातील दुकान बंद झाल्यात जमा आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसवर केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नागपूर दौऱ्यातच त्याला प्रत्युत्तर दिले होते. पवार यांच्या हस्ते नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या विभागीय कार्यालयाचे उद्घघाटन करण्यात आले. एकेकाळी याठिकाणी पटोले यांची उठबस असायची. त्यामुळे पवारांनीच नानांचे दुकान बंद केल्याची चर्चा रंगली आहे.

पटोले यांनी गुरूवारी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट पवारांनाच आव्हान दिलं आहे. सर्वांनी पक्ष वाढवावा, आम्हाला काहीच अडचण नाही. पण आम्ही बारामती (Baramati) मध्ये आलो तर त्यांना अडचण नसावी, असं पटोले म्हणाले आहेत. दरम्यान, नागपुरात बोलताना पवार म्हणाले होते, की काँग्रेस आणि आमची विचारधारा गांधी, नेहरूंची विचारधारा आहे. त्यामुळे काँग्रेसशी मिळतेजुळते विचार मांडतो. सत्तेत एकत्र असताना सहकारी पक्षांबद्दल काय आणि कसे बोलावे, याचे भान प्रत्येक पक्षातील सहकाऱ्यांनी ठेवायला पाहिजे. पटोले हे भाजपकडून खासदार झाले होते. त्यामुळे त्या विचारधारेचा प्रभाव त्यांच्यावर अजून असावा.

पटोले यांनी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपावरही भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, आंदोलन हे चिंतेचा विषय आहे. राज्य सरकारने त्यांच्या मागण्यांना मान्यता दिली आहे. पण त्यानंतरही आंदोलन मागे घेण्यात आलेले नाही. भाजपची भूमिका दुटप्पी आहे. केंद्रात खासगीकरण होत असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप राजकारण करत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घ्यावे, अशी आमचीही भूमिका असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.

पटोलेंनी घेतली फडणवीसांची भेट

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरूवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. महाराष्ट्रात सध्या विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. एका जागेवर काँग्रेसकडून दिवंगत खासदार राजीव सातव (Raveev Satav) यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

पटोले यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी फडणवीसांची भेट घेत असल्याची चर्चा होती. या भेटीनंतर पटोले यांनीच याबाबत खुलासा केला आहे. भाजपकडून या जागेवरुन औरंगाबाद भाजप (BJP) अध्यक्ष संजय केणेकर (Sanjay Kenekar) यांना रिंगणात उतरवलं आहे. केणेकर यांनी उमेदवारी अर्जही देखील दाखल केला आहे. केणेकर उमेदवारी अर्ज मागे घेवून सातव यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी पटोले यांनी केल्याचे समजते.

यावर बोलताना पटोले म्हणाले, राजीव सातव यांच्या पत्नीला तिकीट दिले आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मी फडणवीस यांना भेटलो. निवडणूक बिनविरोध करण्याची राज्याची परंपरा आहे. देवेंद्र फडणवीस ते पक्षात चर्चा करून याबाबत निर्णय घेतील. चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे मत मांडले आहे. आम्ही मन वळवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT