Chhagan Bhujbal - Jitendra Awhad  Sarkarnama
मुंबई

Thane NCP Political News : राष्ट्रवादीत वाद पेटला ; शरद पवार गटाने भुजबळांचा तर अजित पवार गटाने आव्हाडांचा पुतळा जाळला

NCP Sharad Pawar - Ajit Pawar Group : राष्ट्रवादी पक्षासाठी सोमवार ठरला पुतळा दहनाचा वार...

सरकारनामा ब्यूरो

Thane : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर अध्यक्ष शरद पवारांचा बंडखोर मंत्र्यांच्या मतदारसंघात जाऊन सभांचा सिलसिला सुरु आहे. या सभांमधून शरद पवार गटाकडून मंत्र्यांवर जहरी टीकाही करण्यात येत आहे. याचवेळी आता अजित पवार गटाने देखील सभा घेण्यास सुरुवात केली आहे. पवारांच्या सभेला 'उत्तर' म्हणून ही सभा नसणार असल्याचे अजित पवार गटाने सांगितले.

मात्र, सभेत शरद पवारांसह अजित पवार वगळता सर्वच नेत्यांनी टीकेचे बाण सोडले. यात छगन भुजबळांनी तर टोकच गाठले. या टीकेनंतर राष्ट्रवादीतलं वातावरण तापलं आहे. शरद पवार गटाने सोमवारी भुजबळांचा तर अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाडांचा जाळला पुतळा जाळला. यामुळे पुढील काळात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातला वाद चिघळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी टीका केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने छगन भुजबळ यांच्या निषेधार्थ आंदोलन करत, त्यांचा पुतळा जाळला. तर, याला प्रतिउत्तर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्यावतीने आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांचा पुतळा जाळला. तर, आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासाठी सोमवार हा पुतळा दहनाचा वार ठरला.

नेमकं वादाचं कारण काय..?

शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी बीडमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेनंतर रविवारी अजित पवार गटानेही बीड येथे उत्तरसभा घेतली. या सभेतून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. २३ डिसेंबर २००३ साली तुम्ही माझ्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा घेतला. तेव्हा माझी काय चूक होती? असा सवालही भुजबळ यांनी विचारला.

दरम्यान, छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांचं भाषण सुरू असताना सभास्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार आरडाओरड केली. यानंतर छगन भुजबळांना आपलं भाषण आटोपतं घ्यावं लागलं. पण ही आरडाओरड आणि गोंधळ नेमका कशामुळे झाला? याबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत. काहींच्या मते नेत्यांची भाषणं लांबल्यामुळे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. तर काहींच्या मते शरद पवारांवर टीका केल्याने ही आरडाओरड झाल्याचं बोललं जात आहे.

भुजबळ नेमकं काय म्हणाले...?

बीड येथे झालेल्या अजित पवार गटाच्या सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. "साहेब म्हणतात… माझी चूक झाली, माफी मागतो. तुम्ही कोणाकोणाची माफी मागणार, सगळ्यांनी सह्या केल्या आहेत. तुम्हाला जर माफी मागाची असेल तर ५४ ठिकाणी माफी मागावी लागेल" असे म्हणत अत्यंत जहरी टीका केली होती. त्याचे पडसाद ठाण्यात उमटले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई , महिलाध्यक्षा सुजाताताई घाग यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्याकडून भुजबळ यांची गद्दार अशी संभावना करत त्यांच्या पुतळ्यास जोडे मारून पुतळा जाळण्यात आला. भुजबळ यांच्यावर शरद पवार यांनी प्रचंड प्रेम केले होते. तुरुंगातून सुटल्यानंतरही भुजबळ यांना शरद पवार यांनी मंत्रिपद दिले. शरद पवार यांच्याकडून सर्व मिळवून मोठे झाल्यानंतर भुजबळ हे गद्दारी करत असतील तर आम्ही ते सहन करणार नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी दिली.

अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील यानंतर आक्रमक झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रवक्ते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिकेसमोर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी केली. यावेळी जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद, छगन भुजबळ झिंदाबाद, एकच वादा अजितदादा अशा घोषणा दिल्या.

''...यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल!''

परांजपे म्हणाले, बहुजनांचे नेते छगन भुजबळ यांनी काही कथित वक्तव्य केली, म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांचा पुतळा जाळला. त्यांना गद्दार म्हटले. आव्हाड यांचा विरोध केला की गद्दार ! मुळात गद्दार कोण हे या क्रियेवर प्रतिक्रिया म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आव्हाड यांचा पुतळा जाळत उत्तर दिले असून यापुढे त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा देखील परांजपे यांनी यावेळी दिला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT