Ajit Pawar News Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News : अजितदादांना स्वीकारणं भाजप नेत्यांना जड जातंय? नेमकं काय कारण...

Mangesh Mahale

Mumbai : अजित पवार शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा सुरू होती, त्यानंतर आता अजितदादांबाबत भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे उजेडात आले आहे. भाजपच्या काही नेत्यांना अजितदादांना आजही अमान्यच असल्याचे चित्र आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजितदादांवर खालच्या स्तरावर टीका केल्यानंतर भाजपचे नेते मोहित कंबोज यांनीही अजितदादांवर टीका करीत तोंडसुख घेतले. एकनाथ शिंदेंना भाजपने सहज स्वीकारले तसे अजितदादांना भाजपमधील काही नेत्यांना, आमदारांना स्वीकारण्यात जड जात असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांत पडळकर आणि कंबोज यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेमुळे हे स्पष्ट होते की, अजितदादा हे आजही भाजपच्या काही नेत्यांना अमान्यच आहेत.

अजितदादा लवकरच मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने लालबाग राजाच्या चरणी चिठ्ठी ठेवली होती. त्यावर मोहित कंबोज यांनी समाजमाध्यमांवर या मुद्द्याचा खोचकपणे समाचार घेतला होता. "मुख्यमंत्री होण्यासाठी ४५ नाही, तर १४५ आमदार लागतात," असा टोला कंबोजांनी अजितदादांना लगावला होता. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कंबोजांचे कान टोचले आहेत. त्यांना तंबी दिली आहे.

शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यापूर्वी पंचवीस वर्षे युतीत असल्याने शिंदेंना स्वीकारणे भाजप नेत्यांना जड गेले नाही, पण अजितदादांची कार्यशैली आणि त्यांनी घेतलेले निर्णय भाजपच्या काही नेत्यांना अमान्य असल्याचे चित्र आहे. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत भाजप नेते, आमदार, अजितदादांसोबत कसे जुळवून घेतात, हे येत्या काही काळात समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT