Devendra Fadnavis, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : अजितदादांनी बोलून दाखवली मुख्यमंत्री बनायची इच्छा; फडणवीस म्हणतात,'ज्या पक्षाचा सध्या...'

Deepak Kulkarni

Mumbai News : विधानसभा निवडणुकीचं घोडंमैदान अजून दोन महिन्यांच्या अंतरावर असलं तरी महाराष्ट्राच्या 'मुख्यमंत्री'पदाची खुर्ची मात्र अनेकांना आत्तापासूनच खुणावू लागली आहे. या खुर्चीसाठी इच्छुकांनी आत्तापासूनच दावेदारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी असो वा महायुती दोन्ही बाजूला मुख्यमंत्रीपदासाठी घमासान सुरू आहे. महायुतीतील अजित पवारांनी तर आपल्याला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनायचं आहे अशी इच्छाही उघडपणे बोलून दाखवली आहे.

तर दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनंही मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंचंच नाव उचलून धरलं आहे. पण आता उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन सूचक विधान केलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुरुवारी(ता.26) एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात अनेक विषयांवर मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्रि‍पदाविषयी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं. ज्या पक्षाचा सध्या एकच आमदार आहे,त्यालाही मुख्यमंत्री व्हायचं आहे असंही सूचक वक्तव्य करत चिमटाही काढला आहे.

फडणवीस म्हणाले, महायुतीचं सरकार स्थापन झाले तर मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचे उत्तर देण्याची क्षमता माझ्यात नाही. अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडू शकतात.

पण आपण महाराष्ट्र भाजपचा नेता आहे.आमच्या पक्षात मुख्यमंत्री कोण होणार हे संसदीय मंडळ ठरवतं असं स्पष्ट मत देवेंद्र फडणवीसांनी या कार्यक्रमात व्यक्त केले.तसेच एकप्रकारे महायुतीत सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदाविषयीच्या चर्चांचा मोजक्याच शब्दांत विषय संपवला.

याचवेळी फडणवीसांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजप राहणार असून आणि सर्वात मोठी आघाडी महायुती असेल असं आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.तसेच आम्ही पूर्ण बहुमताने महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

एकेकाळी सत्तेतील सहकारी,आणि युतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या राजकीय कटुतेबद्दल फडणवीस म्हणाले,आगामी निवडणुकीत तेही राहणार आहेत,आम्हीही असणार आहोत.जनतेशिवाय असं कोणीच कोणालाही संपवू शकत नाही असंही ठामपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजित पवार नेमकं काय म्हणाले..?

अजित पवार यांनी 'इंडिया टुडे कॉन्क्लेव'मध्ये मुख्यमंत्री पदाविषयी रोखठोक भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते,आपल्याला मुख्यमंत्री बनायचं आहे.पण काय करणार? आमची गाडी तिथेच अडकते. मी प्रयत्न करतो की, ती गाडी पुढे जावी. पण संधी मिळत नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2004 मध्ये मुख्यमंत्रि‍पदाची एक संधी आली होती. पण पक्षाच्या नेतृत्वाने ती संधी गमावली. जो कुणी त्या खुर्चीवर बसतो, त्यांना ती खुर्ची चांगली वाटते.त्याच दृष्टिकोनातून प्रत्येकानं प्रयत्न,आणि काम करायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.मुख्यमंत्रिपदाची खुर्ची एकच आहे. जो 145 चा आकडा मिळवणार, त्याच्याच पक्षाचा मुख्यमंत्री बनणार. माझी महत्त्वकांक्षा काय आहे, ते मी आता बोलणार नाही. आमचं लक्ष्य हे महायुतीच्या रुपाने पुन्हा सत्तेत येणं हे आहे असल्याचंही अजितदादांनी ठणकावून सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT