Tanaji Sawant Sarkarnama
मुंबई

Kalwa Hospital Patient Deaths: एकाच रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू अन्‌ आरोग्य मंत्री म्हणतात, ‘अहवाल आल्यावर कारवाई करू’

सरकारनामा ब्यूरो

Thane Hospital News: ठाण्याच्या कळवा रुग्णालयात एकाच रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यावरून राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर कडक ताशेरे ओढले जात आहेत. त्याबाबत राज्याचे आरोग्य विभागाचे प्रमुख म्हणून आरोग्य मंत्री यांनी तातडीने पावले उचलण्याची गरज असताना ते दोन दिवसांत या प्रकरणाचा अहवाल येईल, त्यानंतर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे सांगत आहेत. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या दिरंगाईबद्दल मृतांच्या नातेवाईकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. (Death of 17 patients in Thane is a very unfortunate incident: Tanaji Sawant)

ठाण्यात वैद्यकीय सेवेबाबत गेल्या दोन दिवसांपासून राज्यात चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना सुनावले होते. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत ठाण्यातील कळवा रुग्णालयात एकाच रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुढे आली आहे. त्यावरून राज्याच्या आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.

एकाच रात्रीत १७ हून अधिक जणांचा मृत्यू होऊनही अरोग्य मंत्र्यांनी नरमाईची भूमिका घेतल्याने मृतांच्या नातेवाईकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. यासंदर्भात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पुण्यात सांगितले की, ठाण्यात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. रुग्णाच्या जीवाशी झालेली हेळसांड अजिबात खपवून घेतली जाणार नाही. ठाणे महापालिकेचे आयुक्त, आरोग्य अधिकारी यांच्याकडून याबाबत माहिती घेतली जाईल. त्याचा अहवाल दोन दिवसांत मिळाल्यानंतर दोषींवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कठोर कारवाई केली जाईल.

सावंत म्हणाले की, ठाण्यात १७ जणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची माहिती आम्ही घेत आहोत. रुग्णांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे का? हेही तपासून पाहिले जाईल. सर्वसामान्यांच्या आरोग्याची हेळसांड करणं, हे माझ्यासारखा मंत्री मुळीच सहन करणार नाही. ज्यावेळी अहवाल येईल, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने योग्य ती कारवाई केली जाईल.

ठाण्यातील संबंधित रुग्णालय हे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येते. पण रुग्णाच्या जिवाशी होणारी हेळसांड आम्ही काहीही झालं तरी सहन करणार नाही. ही घटना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात घडली की गडचिरोलीला घडली की चंद्रपूरला घडली, यामध्ये कुणीही पडू नये. हे सर्व राज्याचे नागरिक आहेत, त्यांची जबाबदारी ही सरकारची आहे. आम्ही त्याची जबाबदारी घेतली आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही सावंत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT