Devendra Fadnavis and Eknath Shinde
Devendra Fadnavis and Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Maharashtra Poltical Crisis: तेव्हा कुठे गेली होती तुमची नैतिकता?; न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीसांचा ठाकरेंना सवाल

सरकारनामा ब्यूरो

SC Final Decision On ShivSena: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला. त्यामुळे आता 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय राज्याचे विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत.

गेल्या 11 महिन्यांपासून देशाचे लक्ष लागून असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले, "न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्ही पूर्णपणे समाधान व्यक्त करतो. लोकशाहीचा पूर्णपणे विजय झाला आहे. असं मी नमूद करतो. या निकालातील पाच ते सहा मुद्यांकडे लक्ष वेदतो. न्यायालयाच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर पूर्णपणे पाणी फेरलं आहे. न्यायालयाने स्पष्टच सांगितलं की टेटस्को करता येणार नाही. उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही", असं फडणवीस म्हणाले.

"दुसरं त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे की, आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्याचा पूर्ण अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा आहे. विधानसभा अध्यक्ष हे या अपात्रतेच्या मुद्यावर निर्णय घेतील. त्यामुळे या प्रकरणामध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे, हे स्पष्ट होत आहे. ज्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे, त्यांना सर्व अधिकार असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे", असंही फडणवीस म्हणाले.

"या बरोबरच न्यायालयाने स्पष्ट केलं की, निवडणूक आयोगाला सर्व अधिकार आहेत. निवडणूक आयोग स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतं. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते पूर्णपणे चुकीचं आहे, हे यातून स्पष्ट झालं आहे".

"यामध्ये अजून एक महत्वाचा निर्णय आहे. पॉलिटिकल पार्टी कोणती आहे? हा अधिकार देखील विधानसभा अध्यक्षांना दिलेला आहे. त्यामुळे आता हे सरकार पूर्णपणे कायदेशीर आहे. आधी देखील कायदेशीरच होतं. पण काही लोकांना शंका होती. पण आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शंकेचं निरसन केलं आहे", असं फडणवीस म्हणाले.

"आज उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पाहिली. त्यामध्ये ते म्हणाले की, नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. पण त्यांना देखील माझा प्रश्न आहे. आमच्यासोबत निवडून आलात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर जाऊन सरकार स्थापन केलं. त्यावेळी तुम्ही तुमची नैतिकता कुठल्या डब्यात बंद केली होती".

"त्यामुळे नैतिकेतचं आम्हाला सांगू नये. खुर्चीसाठी तुम्ही विचारधारा सोडली. खरं तर विचारधारेसाठी एकनाथ शिंदे यांनी खुर्ची सोडली. कारण ते सत्तेमध्ये होते, त्यावेळी आम्ही विरोधी पक्षात होतो. पण तरी देखील ते आमच्याबरोबर आले", असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना टोला लगावला.

(Edited By - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT