Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : हक्कभंगाचा आदेश काढला अन् बाळासाहेबांना विधानसभेत यावं लागलं...

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadnavis : आज ज्या सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावले आहे, त्या सभागृहाचा मोह बाळासाहेबांना कधीच नव्हता. त्यांनी मनात आणले असते तर कधीही विधानसभागृहात आले असते. मात्र, त्यांना एकदा या सभागृहात वेगळ्याच कारणास्तव यावे लागले होते. त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक किस्सा सांगितला.

शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त विधानसभागृहात तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात फडणीवीस बोलत होते.

फडणवीस म्हणाले, ''बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व मुंबईतील महासागरासारखे होते. ते प्रसंगी शांत होते. तसेच वेळ आली तर तुफानासारखा संघर्षही करीत होते. त्यांचे विचार अथांग, अतिशय खोल होते. ते स्पष्ट बोलायचे. एकदा बोलले की पुन्हा शब्द माघारी न घेणारे राजकारणात कमी लोक आहेत. त्यातील बाळासाहेब एक होते. कोणत्याही नुकसानीची परवा न करता त्यांची भूमिका कायम राहत होती. या गुणांमुळेच त्यांचे नेतृत्व देशपातळीवर मान्यता पावलेले होते.''

''बाळासाहेबांनी कधी जात पात पाहिली नाही. जातीपातीचे राजकारण केले नाही. कमी मतदार असूनही अनेकांना तिकिट देऊन निवडून आणण्याचे काम त्यांनी केले. जातीचे राजकारण करणाऱ्यांना त्यांनी पराभूत केले. अशा या नेत्याला कोणत्याही पदाचा मोह झाला नाही. त्यांनी विचार केला असता तर ते मुख्यमंत्री होऊ शकले असते. मात्र, त्यांना एका कारणामुळे विधानसभागृहात यावे लागले होते'', असे सांगत फडणवीसांनी तो किस्सा सांगितला.

फडणवीस म्हणाले की, ''त्यावेळी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पक्ष बदलला होता. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सामना वृत्तपत्रात कार्टुन काढले होते. ते त्यावेळच्या विधानसभा अध्यक्षांवर होते. त्यामुळे आर. आर. पाटील यांनी कार्टुन काढल्यानंतर हक्कभंग आणला. तो हक्कभंग समितीकडे गेला.

त्यांनी एक निर्णय घेतला. त्यात म्हटले होते की, कार्टुन काढणारा कुणीही असो. ते वृत्तपत्र चालविणारे कुणीही असो. मात्र, त्या वृत्तपत्राचे प्रबंध संपादक आहेत, त्यांना बोलावले पाहिजे. तशी नोटीस समितीने बाळासाहेबांना पाठवून विधानसभेत उपस्थित राहण्याचे आदेश दिले.''

बाळासाहेब पत्रकार, व्यंगचित्रकार, तत्वाने चालणारे होते. ते लोकशाहीला मानत होते. त्यांना पत्रकारांच्या अभिव्यक्त स्वांतत्र्याची जाणही होती. मात्र, हक्कभंगाचा आदेश निघाल्यानंतर त्यांनी लोकशाहीच्या मूल्यांचा मान राखला आणि विधानसभेत हक्कभंग समितीपुढे गेले. त्यावेळी ते एकदा नव्हे चार वेळा समितीपुढे उपस्थित राहिले. समितीकडून बाळासाहेबाना शिक्षा दिली. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांच्या (Sharad Pawar) सभागृहातील प्रस्तावनुसार शिक्षा मागे घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT