Deputy CM Ajit Pawar Latest Marathi News
Deputy CM Ajit Pawar Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

निवडणूक बिनविरोध नाही, सगळा खेळ अपक्षांवर! अजितदादांनी वाढवलं शिवसेनेचं टेन्शन

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरूवात झाली असली तरी अद्याप कोणत्याही पक्षानं उमेदवार जाहीर केलेले नाहीत. तर सहाव्या जागेवरून राजकारण तापलं आहे. शिवसेनेकडून या जागेवर उमेदवार दिला जाणार आहे. तर संभाजीराजे छत्रपतीही (Sambhajiraje Chhatrapati) अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची दाट शक्यता आहे. भाजपकडूनही तिसरा उमेदवार दिला जाऊ शकतो. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचे टेन्शन वाढलं आहे. (Deputy CM Ajit Pawar Latest Marathi News)

राज्यसभेच्या निवडणुकीत विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. पण सहाव्या जागेवरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यास या निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. (Rajya Sabha Election Latest Marathi News)

याविषयी माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, तिसऱ्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेकडे काही मतं आहेत. मागीलवेळी पवारसाहेबांनी विनंती केल्यानंतर तिन्ही पक्षांनी प्रयत्न केला होता. यावेळी शिवसेनेने जागा मागितली. त्यांचा तो अधिकार आहे. लवकरच उमेदवार जाहीर करण्यास सुरूवात होईल आणि अंतिम चित्र स्पष्ट होईल.

निवडणूक बिनविरोध होणार नाही असं स्पष्ट करून पवार म्हणाले, 'एक जागा राष्ट्रवादी, एक काँग्रेस आणि एक जागा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेला आम्ही दुसऱ्या जागेसाठी मतं देणार आहोत. भाजपच्या दोन जागा सहज निवडून येतात. त्यांच्याकडे 27-28 अतिरिक्त मतं आहेत.

पक्षाच्या आमदारांना मतं कुणाला दिलं हे दाखवावं लागतं. पण मला काल माहिती मिळाली आहे. अपक्षांना मतं कुणाला दिलं हे दाखवण्याचा अधिकार नाही. त्यामुळे सगळा खेळ अपक्षांवर आहे,' असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिवसेनेचा दुसऱ्या उमेदवाराला अपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच अपक्षांची बैठकही घेतली आहे.

तपास यंत्रणांचा गैरवापर होऊ नये

परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, केंद्रीय यंत्रणा हे वेगवेगळ्या पध्दतीने त्यांच्या अधिकारांचा वापर करत असतात. मागेही प्राप्तीकर, सीबीआय, ईडीच्या कारवाया झाल्या आहेत. माझ्याही नातेवाईकांवर धाडी टाकल्या होत्या. आताही कारवाई सुरू आहे. परंतु, कुठल्या आधारावर कारवाई सुरू आहे, हे माहिती नाही. आता आमक्याचा नंबर, तमक्याचा नंबर अशा गोष्टी काही जण बोलतात अन् तशा कारवाया होतात. कारवाई करायला कुणाची ना नाही. कुठल्याही तक्रारी आल्यातर राज्य सरकारची यंत्रणाही कारवाई करू शकतो. तशा केंद्राच्या यंत्रणाही करू शकतात. पण त्याचा गैरवापर होऊ नये, अशी अपेक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT