Devendra Fadanvis - Rahul Gandhi, Latest News
Devendra Fadanvis - Rahul Gandhi, Latest News Sarkarnama
मुंबई

अरे भाई कहना क्या चाहते हो? फडणवीसांनी उडवली राहुल गांधींची खिल्ली...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काल स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात एक पत्र वाचून दाखवित ते माफीवीर असल्याचा आरोप केला होता, त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.१८ नोव्हेंबर) सडेतोड उत्तर दिले आहे. त्याच वाक्यरचनेचे महात्मा गांधी यांचे पत्र त्यांनी ट्विट करीत राहुल गांधींना प्रश्न विचारले आहेत.

वीर सावरकर यांच्या पत्रातील ‘आय बेग टू रिमेन युवर रॉयल हायनेस ओबिडियन्ट सर्व्हंट’ या वाक्यावरून राहुल गांधी यांनी टीका केली होती. तेच वाक्य असलेले महात्मा गांधी यांचे पत्र आज देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले. सोबतच राहुल गांधी यांच्या आजी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांबाबत लिहिलेले पत्र, ज्यात सावरकरांना स्वातंत्र्य आंदोलनातील एक भक्कम आधारस्तंभ आणि भारताचे एक संस्मरणीय पुत्र म्हणून उल्लेख केला आहे, तेही पत्र फडणवीस यांनी ट्विट केले. (Devendra Fadanvis - Rahul Gandhi, Latest News)

माजी मुख्यमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांचे वीर सावरकरांबाबत भाषण आणि त्यांच्याविषयी लिहिलेले पत्र, ज्यात दोन जन्मठेपेंचा उल्लेख आहे, तेही पत्र फडणवीसांनी ट्विट केले आहे. वीर सावरकर यांची सामाजिक सुधारणांसाठी असलेली प्रतिबद्धता, युवा पिढीला प्रेरणा आदींबाबत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी दिलेला संदेश सुद्धा त्यांनी ट्विट केला आहे.

याचबरोबरोर त्यांनी आज काही वृत्तपत्रांची जुनी कात्रणे देखल ट्विट केली, ज्यामध्ये महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना प्रखर देशभक्त, असीम त्यागाचे प्रतीक आणि प्रत्येकाच्या हृदयात सन्मानाशिवाय दुसरी कोणती भावनाच असू शकत नाही, असे संबोधले आहे. एवढेच नाही तर हिंदूत्त्वाच्या रक्षणासाठी सावरकरांनी घेतलेला पुढाकार आणि त्यांच्या विचारांवरच चालण्याची आवश्यकता याचीही गरज प्रतिपादीत केली आहे.

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, इंडियन नॅशनल चर्चचे फादर विल्यम्स, श्रीमती इंदिरा गांधी, तत्कालिन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सावरकरांबद्दल व्यक्त केलेल्या भावनांच्या संदर्भातील वृत्तपत्र कात्रणे सुद्धा त्यांनी ट्विट केली आहेत. राहुल गांधी हे वारंवार अशी विधाने करुन आपली व्होट बँक वाचवित असतील. पण, असेच सिलेक्टिव्ह वाचत राहिले, तर येणार्‍या अनेक पिढ्या त्यांना म्हणतील, अरे भाई कहना क्या चाहते हो, असा सवालही फडणवीसांनी उपस्थित करत राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) वक्तव्याची खिल्ली उडवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT