Devendra Fadnavis & Uddhav Thackeray
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

मुख्यमंत्र्यांची मोदींवरील टीका फडणवीसांच्या जिव्हारी; म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज (ता.27 एप्रिल) कोरोनाबाबत बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारमुळे (State Government) पेट्रोल आणि डिझेलचे दर चढे राहिल्याचा आरोप केला होता. पंतप्रधानांच्या या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सडेतोड प्रत्युत्तर देत, 'महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत सापत्न वागणूक दिली जात आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया ठाकरे यांनी व्यक्त केली.

'नागरिकांना वस्तुस्थिती कळावी म्हणून हे स्पष्ट करणे आवश्यक आहे,' असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली असून दोषारोप आणि जबाबदारी झटकणे यापेक्षा दुसरे काही करणार तरी आहात का?, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना डिवचले आहे.

फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले ट्वीट शेअर करत त्यांच्यावर ट्वीटरच्या माध्यामातून टीका केली आहे. फडणवीस म्हणाले, दोषारोप आणि जबाबदारी झटकणे! यापेक्षा दुसरे काही करणार तरी आहात का? मुद्दा पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा आणि तुम्ही जीएसटीचा विषय घेऊन बसलात. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राच्या नफेखोरीची ‘पोलखोल’ करताच तुमचे अरण्यरुदन सुरू!

जीएसटीचा निधी राज्याला नियमित मिळतच असतो, जुनीही थकबाकी मिळाली आणि उरलेली देण्याची मुदत जुलै 2022. मग जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर पेट्रोल-डिझेलवर आकारलेला अतिरिक्त कर ग्राहकांना परत करणार का?

शेजारच्या दीव-दमणमध्ये 103 रुपयांत पेट्रोल मिळते, तर महाराष्ट्रात 120 रुपयांना का? याचे उत्तर मिळालेच पाहिजे आणि दुसरे म्हणजे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनाचा आदर करीत महाराष्ट्रातील जनतेला, मराठी माणसाला तत्काळ दिलासा द्या!, अशा शब्दात फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंना सुनावले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले होते की, 'आज राज्य सरकार वारंवार राज्यातील आपत्तीच्या वेळी एनडीआरएफचे तोकडे निकष वाढवून आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची मागणी केंद्राकडे करीत आले आहे, मात्र केंद्राने यावर काहीही पाऊले उचलली नाही. उलटपक्षी राज्याने विविध आपत्तीत निकषापेक्षा जास्त मदत करून दिलासा दिला आहे. चक्रीवादळात गुजरातला महाराष्ट्रापेक्षा जास्त मदत केली गेली, 'शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा केवळ निर्णय घेतला नाही तर त्यांना ती मिळेल हे पाहिले. कोविड काळात सर्व दुर्बल, असंघटित क्षेत्रातील नागरिकांनाही आर्थिक साहाय्य केले. शिवभोजनसारखी थाळी मोफत दिली. आर्थिक आव्हानांना पेलत महाराष्ट्राने आपली जबाबदारी पार पाडली. संघराज्याविषयी बोलताना सर्व राज्यांना केंद्राकडून समान वागणूक मिळणे अपेक्षित आहे,' असे ठाकरे यांनी म्हटले होते.

दरम्यान, "महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात (डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र केले तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे असे असूनही आजही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे," अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी मोदींना करुन दिली होती. यावर आता फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT