Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : 'मोदींची दहा वर्षे हे तर फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है' ; फडणवीसांचं मोठं विधान!

Mayur Ratnaparkhe

BJP News 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारची दहा वर्षे हे तर ट्रेलर होतं, पिक्चर अभी बाकी है. पुढची पाच वर्षे ही या दहा वर्षांपेक्षाही भारी असणार आहेत.' असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपाच्या कार्यकर्ता संमेलनात म्हटलं. याप्रसंगी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक अतिशय सुंदर वाक्य सांगितलं, मोदी म्हणाले की तिसऱ्यांदा या भारतामध्ये आम्ही सरकार तयार करणार आहोत. पण तिसऱ्यांदा सरकार तयार करताना आमची प्रेरणा काय आहे? मोदी म्हणाले आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक झाला. पण राज्याभिषेक झाल्यानंतर एकही दिवस शिवाजी महाराज स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी कधीही ते राज्य भोगलं नाही. दुसऱ्या दिवसापासून ते स्वराज्याच्या विस्तारासाठी बाहेर पडले. थेट स्वर्गवासी होईपर्यंत देशाची सेवा ते करत राहीले. मोदी म्हणाले आम्हालाही राज्य यासाठीच हवं आहे. एकही दिवस, एकही क्षण आम्हाला घरी बसायचं नाही. या भारतमातेची सेवा करून विकसित भारत आम्हाला तयार करायचा आहे. त्यासाठी तिसऱ्यांदा आम्हाला राज्य हवं आहे.' असंही फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले.

याशिवाय 'दहा वर्षे आपण मोदींचं राज्य बघितलं, दहा वर्षांत बदललेला भारत बघितला. जगामध्ये बदललेली भारताची प्रतिमा आपण बघितली. भारताच आत्मसन्मान, स्वाभिमान भारतीयांचा आत्मभिमान सगळं बदलेलं आपण बघितलं. एक मजबूत भारत होताना आपण बघितला. पण मोदींच्या ज्या संकल्पना आहेत. त्या संकल्पना पाहिल्यानंतर मी असं म्हणेण. दहा वर्ष हे तर ट्रेलर होतं, पिक्चर अभी बाकी है. पुढची पाच वर्षे ही या दहा वर्षांपेक्षाही भारी असणार आहेत.' असा विश्वास फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.

याचबरोबर 'पुढची पाच वर्षे विकसित भारताची मुहूर्तमेढ करणारी असणार आहेत, भारताला आर्थिक महासत्ता बनवणारे असणार आहेत, भारताच्या गरिबी निर्मुलनाच्या अंतिम लढ्याचे असणार आहेत, भारताला जगाचं नेतृत्व करणारे असणार आहेत आणि जगाला हेवा वाटावा अशा भारताच्या निर्मितीकडे घेऊन जाणारे असणार आहेत. मोदींनी आपल्याला भाजपाचे कार्यकर्ते म्हणून केवळ १०० दिवस आपल्याला मागितले आहेत.'

'हे शंभर दिवस भाजपासाठी नाहीतर हे शंभर दिवस भारतासाठी आपल्याला द्यायचे आहेत. कारण, भारताचं भवितव्य हे मोदींच्या हातून घडणार आहे. भाजपा निवडून आणण्यापेक्षा भाजपाला मजबूत नेता आणि मजबूत सरकार देणं हा या पाठीमागचा आपला उद्देश आहे. म्हणून एका मोठ्या ध्येयासाठी आपण सगळे मैदानात उतरलो आहोत.' असं मार्गदर्शन फडणवीसांनी यावेळी भाजपा कार्यकर्त्याना, पदाधिकाऱ्यांना केलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT