Dilip Walse Patil & Sameer Wankhede 
मुंबई

वानखेडेंवर पोलिसांची पाळत? वळसे पाटील म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अंमलीपदार्थ विरोधी विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Samer Wankhede) यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. याबाबत त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रारही केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांकडूनच पाठलाग केला जात असल्याचीही चर्चा आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

वानखेडे यांच्या नेतृत्वाखाळी एनसीबीने क्रुझवर छापा टाकत आर्यनसह काही जणांना अटक केली आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या खूपच चर्चेत आहे. शाहरूख खान व बॉलीवू़डला लक्ष्य करण्यासाठी आर्यनला अटक केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच भाजप व एनसीबीने कटकारस्थान करून ही कारवाई केल्याचंही मलिक यांनी म्हटलं आहे. वानखेडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

हा मुद्दा चर्चेत असतानाच वानखेडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे. दिलीप वळसे पाटील यांनी वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्याचे कुठलेही आदेश दिलेले नाहीत, असं स्पष्ट केलं आहे. अशी कुणावर काही पाळत ठेवली जात नाही, असंही ते म्हणाले.

सीबीआयनं डीजीपी व मुख्य सचिवांना समन्स पाठवल्याचं आपल्याला माहित नसल्याचं वळसे पाटील म्हणाले आहेत. तर रश्मी शुक्ला प्रकरणात सीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांना साक्षीसाठी बोलावलं असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यामध्ये वाढणारी गुन्हेगारी, महिला अत्याचार आदी मुद्यांचा आढावा घेण्यासाठी दुपारी दोन वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतील जाणार असल्याचेही वळसे पाटील यांनी सांगितले.

वानखेडे यांची काय आहे तक्रार?

वानखेडे हे आईवर अंत्यसंस्कार केलेल्या स्मशानभूमीत नेहमी जातात. तिथेच पाळत ठेवली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी पोलिसांना काही पुरावेही सादर केले आहेत. पोलिसांनी स्मशानभूमी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतल्याचे समजते. ही पाळत नेमकी कुणाकडून व कशासाठी ठेवली जात आहे, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.

दरम्यान, समीर वानखेडे हे ड्रग पार्टीवर टाकलेल्या छाप्यानंतर चर्चेत आलेले नाहीत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर बॉलीवूडची ड्रग्ज मंडळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या ( NCB) रडारवर आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीने गेल्या एका वर्षात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी केली आहे. त्यानंतरही एनसीबीने अनेक धडाकेबाज कारवाया करत ड्रग्ज पेडलर्सच्या पोटात गोळा आणला आहे. सुशांतपासून शाहरुख खानच्या मुलापर्यंत समीर वानखेडे (sameer Wankhede) यांनी कोणत्याही राजकारणी किंवा सेलिब्रिटीला न जुमानता या कारवाया केल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT