sharad pawar | uddhav thackeray | Nana Patole  Sarkarnama
मुंबई

Mahavikas Aghadi : मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीत ठिणगी?

Akshay Sabale

लोकसभेला 'आत्मबळ' वाढलेल्या महाविकास आघाडीनं विधानसभेची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपासंदर्भात चर्चा आणि बैठका सुरू झाल्या आहेत. शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याकडे त्यादृष्टीनं पाहिलं जात आहे. पण, महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून ठिगणी पडल्याचं दिसत आहे.

त्याला पार्श्वभूमी आहे, माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केलेल्या वेग-वेगळ्या वक्तव्याची. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं एकमत नसल्याचं समोर आलं आहे.

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांचा चेहरा समोर ठेऊन निवडणुकीला सामोरे जावं, अशी मागणी ठाकरे गटाकडून होत आहे. पण, विरोधी पक्ष कुणाचाही चेहरा ठेऊन निवडणुकीला सामोरे जात नाही. कुणाच्याही चेहऱ्याची गरज नाही, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलं आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी राज्याला एक चेहरा नेहमीच द्यावा लागतो, असं म्हटलं आहे. चेहरा विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षालाही असावा लागतो, असंही राऊतांनी सांगितलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का? असा प्रश्न एका वृत्तवाहिनीनं विचारल्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं, "विरोधी पक्ष कुणाचाही चेहरा ठेऊन निवडणुकीला सामोरे जात नाही. कुणाच्याही चेहऱ्याची गरज नाही. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावरून निवडणूक लढवली जाणार आहे. सत्तेत आल्यावर जाहीरनाम्यातील वचने पूर्ण केली जातील."

"ज्या पक्षाला विधानसभेला जास्त जागा मिळतील, त्यांना मुख्यमंत्रिपद मिळते. मग, जास्त जागा निवडून आलेल्या पक्षातील कुणाला मुख्यमंत्री करायचे, हे त्या पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याची गरज नाही," असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

संजय राऊत यांनी काय म्हटलं?

यावर संजय राऊत म्हणाले, "मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत भविष्यात कळेल. महाविकास आघाडी एकत्र असल्यानं कोणताही महत्त्वाचा निर्णय एक पक्ष जाहीर करणार नाही. अन्यथा चार भिंतीत ठरलेल्या कराराचं ते उल्लंघन केल्यासारखं होईल."

"पृथ्वीराज चव्हाण यांचं एखादं मत असू शकते. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यात काही वेगळ्या गोष्टी नक्कीच ठरलेल्या आहेत. राज्याला एक चेहरा नेहमीच द्यावा लागतो. लोकसभेला राहुल गांधी पंतप्रधानपदाचे चेहरे झाले असते, तर अनेक ठिकाणी भाजपचा पराभव झाला असता. राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्यावर आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षालाही चेहरा असावा लागतो. देशात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या अन्याय, अत्याचाराविरोधात राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी कोणतीही पर्वा न करता आवाज उठविला आहे," असं संजय राऊत यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT