Sambhaji Bhide Raj thackeray Controversy : Sarkarnama
मुंबई

Sambhaji Bhide Controversy : भिडेंच्या वादग्रस्त विधानानंतर मनसेच्या पोस्टची चर्चा; 'गांधीजींसारखा दुसरा होणे नाही..'

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात आता राज्यभरात विरोधी पक्षाचे नेते रस्त्यावर उतरू लागले आहेत. राज्यात विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत. भिडेंना चोवीस तासांत अटक करा अन्यथा अधिक तीव्रपणे आंदोलने करू, असा इशारा विरोधकांनी दिला. आता या सर्व घडामोडीनंतर मनसेच्या एका पोस्टची चांगलीच चर्चा आहे.

भिडेंच्या विधानामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भिंडेंवर अप्रत्यक्ष नाव न घेताच निशाणा साधला असल्याचे दिसून येत आहे. मनसेने राज ठाकरेंची एक जुनी शेअर करत महात्मा गांधींना अभिवादन केले आहे.

राज ठाकरे यांची पोस्ट शेअर करत मनसेने म्हंटले, "महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधींजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही.

विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले, कमालीचे लोकप्रिय झाले आणि पुढे काही वर्षातच मागे पडताना दिसले आहेत. दुसरं महायुद्ध जिंकल्यावर चर्चिल, जगाला फॅसिझमच्या विळख्यातून सोडवणारा तारणहार म्हणून पुढे आले. पण त्यांची लोकप्रियता पुढे झपाट्याने ओसरली. ह्याला कारण चर्चिल ह्यांचं योगदान एका विशिष्ट परिस्थितीला पूरक होतं, ते चिरकाल टिकावं असं नव्हतं. पण गांधीजींचं तत्वज्ञान व्यापक होतं.

शृंखला मग त्या अज्ञानाच्या असोत की गुलामगिरीच्या, वसाहतवादाच्या की जातींच्या, त्या शृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कोणालाच नाही, कारण सगळी माणसं ही मुळात समान आहेत, इतकं सोपं तत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे, म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही. गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन."

संभाजी भिडे काय म्हणाले होते ?

"मोहनदास हे करमचंद गांधींच्या चौथ्या पत्नीचे अपत्य होते. करमचंद गांधी एका मुस्लीम जमीनदाराकडे काम करायचे आणि एक दिवस त्याच जमीनदाराचे पैसे घेऊन ते पळून गेले. त्यामुळे चिडलेल्या त्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या चौथ्या पत्नीला पळवून नेलं आणि त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास गांधींचे वडील नाहीत. त्यांचे वडील मुस्लीम जमीनदार असल्याचे वादग्रस्त विधान संभाजी भिडेंनी केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT