Doctor Assault Case : शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन रुग्णालयातील सुविधा आणि आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका करत शहरातील आरोग्य व्यवस्थेच्या दुर्दशेसाठी सत्ताधाऱ्यांनाच जबाबदार धरले.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या तीन साथीदारांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही वेग आला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मनसेचे माजी आमदार राजू पाटील म्हणाले, "रमेश म्हात्रे यांनी केलेल्या कृत्याचे आम्ही कोणत्याही परिस्थितीत समर्थन करत नाही. कायदा हातात घेणे चुकीचेच आहे. मात्र, त्या दिवशी एका रुग्णाच्या नातेवाईकांकडून अशीच प्रतिक्रिया आली असती तर काय झाले असते, याचाही विचार झाला पाहिजे. रुग्णालयात आवश्यक सुविधा नसतील, तर नागरिकांच्या संतापाला जबाबदार कोण?"
यावेळी त्यांनी थेट रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. "गेली ३० वर्षे या शहरात सत्ता असलेल्यांनी नेमके काय केले? रवींद्र चव्हाण चार वेळा आमदार राहिले, वैद्यकीय शिक्षण मंत्रीही होते. त्यांनी शास्त्रीनगर रुग्णालयासाठी काय केले? सहा दिवस पाऊस होता, आज रवी दिसला; पण आमच्या डोंबिवलीचा 'रवी' कुठेच दिसला नाही," असा टोला त्यांनी लगावला.
मनसे सत्तेत आल्यानंतर अवघे सहा महिने झाले असताना सर्व प्रश्न आमच्याकडेच विचारले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. "जे लोक तीन दशकांहून अधिक काळ सत्तेत होते, त्यांना कोणी जाब का विचारत नाही? आम्हाला पाच वर्षे काम करू द्या, त्यानंतर आमच्या कामाचा हिशेब जरूर मागा," असे ते म्हणाले.
डोंबिवलीतील नागरी सुविधांवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "डोंबिवलीच्या मध्यभागी पोस्टमार्टम कक्ष आणून ठेवला आहे. रामनगर स्मशानभूमी स्थलांतरित करण्याची मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करत आहोत. शहराबाहेर असायला हव्या त्या सुविधा शहरात आणल्या जातात आणि शहरात आवश्यक असलेल्या सुविधा मात्र उपलब्ध होत नाहीत. हा संपूर्ण अनागोंदी कारभार असून त्यासाठी सत्ताधारी आणि प्रशासन दोघेही जबाबदार आहेत," अशी टीका त्यांनी केली.
मारहाणीच्या घटनेचा पुन्हा उल्लेख करत राजू पाटील म्हणाले, "रमेश म्हात्रे यांनी जे केले ते चुकीचेच आहे. मात्र, या घटनेमागे नागरिकांच्या मनात साचलेला संताप आणि रुग्णालयातील व्यवस्थेविषयीचा रोष याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. लोकांच्या उद्रेकामागील कारणे समजून घेऊन आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करणे हीच काळाची गरज आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.