Dombivli: महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघा एक दिवस उरलेला असताना शिंदे गट आणि भाजपकडून अधिकृत उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांमध्ये युती झाली आहे की नाही, याबाबतही नेतृत्वाकडून स्पष्ट भूमिका घेतली जात नसल्याने डोंबिवली व कल्याण परिसरात कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदेंच्या होमग्राऊंडवरच नाराजी उफाळून आल्याचे चित्र दिसून आले आहे. माजी सभागृह नेते आणि गटनेते कैलास शिंदे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेले पत्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. तिकीट न मिळाल्याने आणि संभाव्य युतीमुळे अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे देत पक्ष नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. त्याचवेळी भाजपमधील इच्छुक उमेदवारांमध्येही अस्वस्थता वाढली आहे. सोशल मीडियावरून पक्षाच्या निर्णयप्रक्रियेविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. काही इच्छुकांनी तर “पक्ष कारवाई करेल तरी चालेल, पण आम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार,” असा आक्रमक इशारा दिला आहे.
शिंदे सेनेचे माजी परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी वैयक्तिक कारणांसह सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेत कल्याण पूर्व उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुखांकडे सादर केला आहे. माजी सभागृह नेते आणि गटनेते कैलास शिंदे यांनी थेट पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवत, पक्षात निष्ठा व कामापेक्षा आर्थिक निकषांना महत्त्व दिले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी आपल्या पत्रात “माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी,” अशी मागणी केल्याने शिंदे गोटात खळबळ उडाली आहे.
“माझी शिवसेनेतून (शिंदे गट) हकालपट्टी करा,” अशी मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्याच्या राजकारणात निष्ठा, कार्य, अनुभव किंवा शिक्षणापेक्षा आर्थिक ताकदीलाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची खंत त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे. “आज निवडणूक लढवण्यासाठी पात्र ठरण्याचा निकष म्हणजे आर्थिक सक्षमतेचा झाला आहे. तुमच्याकडे पैसा नसेल, तर तुम्ही कितीही काम केले असले तरी त्याला किंमत उरलेली नाही,” असा थेट आरोप त्यांनी पत्रात केला आहे.
धर्मवीर आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचा कट्टर कार्यकर्ता असल्याचे नमूद करताना, “निवडणूक लढवण्यासाठी लागणारी आर्थिक क्षमता माझ्याकडे नाही. त्यामुळे मी केडीएमसी निवडणुकीसाठी तिकीट मिळवण्यास पात्र नाही,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत लिहिले आहे. माझ्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ नये, यासाठीच माझी पक्षातून हकालपट्टी करावी, अशी ‘नम्र विनंती’ त्यांनी पत्रात केली आहे. “गुरुबंधू” असा उल्लेख करत एकनाथ शिंदेंना संबोधणाऱ्या या पत्रातील शब्दरचना आणि उपरोधिक सूर सध्या विशेष चर्चेत आहे.
पत्राच्या शेवटी “तसदीबद्दल क्षमस्व आणि आपणास शुभेच्छा,” असे शब्द वापरत त्यांनी पत्र संपवले असून, या वाक्यांनीही राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत.
शिंदे गट आणि भाजपमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने महायुतीतील अस्वस्थता तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट व भाजपमधील तब्बल 25 ते 30 नाराज माजी नगरसेवक आणि पदाधिकारी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या संपर्कात असल्याचा दावा नाराज पदाधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे. महायुतीतील ही धुसफूस निवडणुकीत मोठे राजकीय वळण घेण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.