Mumbai, 26 December : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी जे कोणी गुन्हेगार आहेत, त्या सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. संबंधित आरोपी कोणच्याही, अगदी माझ्याही जवळचा असला तरी त्याला सोडायचे नाही, त्यालाही फाशी झालीच पाहिजे, या मताचा मी पहिल्या दिवसांपासून आहे, अशा शब्दांत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख खून प्रकरणावर भाष्य केले.
राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी या विभागाची आज पहिलीच बैठक घेतली. त्या बैठकीनंतर माध्यमाशी बोलताना मुंडे यांनी संतोष देशमुख खूनप्रकणावर भाष्य केले. ते म्हणाले, संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी कोणी केली, त्याला शिक्षा झाली पाहिजे, ते फासावर गेले पाहिजेत, या मताचा मी पहिल्या दिवसांपासून आहे.
संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हे माझ्या बीड जिल्ह्यातील एक सरपंच आहेत. मलाही त्यांच्याबाबत तेवढाच आदर आहे. या प्रकरणात जे कोणी गुन्हेगार आहेत, त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा. मग तो कोणीही असूद्या. कुणाच्याही कितीही जवळचा असो. अगदी माझ्याही जवळचा असो. त्यालासुद्धा सोडायचं नाही, असे एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावर काही जणांनी आरोप करणे, यामागे काय राजकारण असू शकतं, हे आपण समजू शकता, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
मंत्री मुंडे म्हणाले, राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयास येत्या पाच वर्षांत फार वेगाने आणि चांगलं काम करावं लागणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभाग हा फार महत्वाची सेवा देणारा विभाग आहे. या विभागाची सेवा शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत आपण पोचवली तर त्याच्यासारखा आशीर्वाद आणि पुण्य दुसरं काही नाही, हे समजणारा मी कार्यकर्ता आहे.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी माझ्यावर अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबादारी दिली आहे. त्यामुळे या विभागात पारदर्शकता आणून शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत आपण जो काही लाभ देत आहोत. तो लाभ पोचला पाहिजे. गरजू लाभार्थीपर्यंत लाभ पोचवत असताना विभागाच्या सर्व सुविधाही तेवढ्याच कार्यत्परतेने काम करणे गरजेचे आहे. रेशनचे धान्य पोचविण्यासाठी लॉजिस्टकला लागणारा अवास्तव खर्च कमी करून त्यातून अधिकच्या लाभार्थ्यांपर्यंत कसे अन्नधान्य पोचवता येईल. या विषयावर आज पहिल्याच बैठकीत चर्चा झाली, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचा शंभर दिवसांचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासंदर्भात काही सूचना आजच्या बैठकीत मी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. योगायोगाने मुख्यमंत्र्यांची बैठकही त्या ठिकाणी होती, त्यामुळे आमच्यामध्ये नमस्कार चमत्कार झाला, असेही मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.