Ajit Pawar-Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar : अजितदादांच्या विमान अपघाताच्या अंतिम अहवालाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं भाष्य; सीसीटीव्ही, ब्लॅक बॉक्स, पायलटच्या बॅंक बॅलन्सवरही बोलले...

Devendra Fadnavis On Ajit Pawar Plane Crash Inquary : अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासासाठी परदेशी तज्ज्ञ आणि अमेरिकेतील एजन्सीची मदत घेतली आहे. अंतिम अहवाल जानेवारीपूर्वी येईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 10 July : अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाचीही माहिती सभागृहात मांडली. या अपघाताच्या तपासासाठी परदेशातील तज्ज्ञ, अमेरिकेतील एक एजन्सीचीही मदत घेतली आहे. दादांच्या अपघाताचा अंतिम अहवाल जानेवारीपूर्वी येईल, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यासोबत सुमीत कपूरचा बॅंक बॅलन्स, सीसीटीव्ही फुटेजबाबतही महत्वाची माहिती देत यातील सत्य शोधून काढल्याशिवाय गप्प राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले, अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास दोन प्रकार सुरू आहे. सीआयडी आणि एएआयबी या दोन संस्था तपास करत आहेत. पण, सीबीआय तपास का केला जात नाही, असा मुद्दा चर्चेत आला. पण, सीबीआयने सांगितले की, एएआयबीचा रिपोर्ट महत्वाचा आहे, तो आल्यानंतरच तपास आमच्याकडे घेऊ. त्याच्या अगोदर आम्ही तो घेणार नाही. त्यामुळे आपण एएआयबीच्या रिपोर्टची वाट पाहात आहोत.

अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात सीआयडीने जो तपास केला आहे, त्यात वेगवेगळ्या गोष्टींसोबत एक शंका पायलट सुमीत कपूर यांच्याबदलही होती. त्याचं बॅंक खातं, इन्शुरन्स पॉलिसी, शेअर मार्केटमधील गुंतवणूक हे सर्व काही तपासलं आहे, त्यात काहीही संशयास्पद आढळलेलं नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, सर्व सीसीटीव्ही फुटेज मिळविले असून त्याचे विश्लेषण केले आहे. उपलब्ध साक्षी पुरावे आहेत, ते तयार केलेले आहेत. पण, या सर्वांमध्ये एएआयबीचा रिपोर्ट सर्वांत महत्वाचा आहे. त्याची माहिती घेतली असता असं सांगण्यात आलं आहे की, जेवढे काही इक्विपमेंट होते, जे डाऊनलोड करायचे होते. ते शंभर टक्के डाऊनलोड झाले आहेत. ब्लॅक बॉक्समधील माहितीही १०० टक्के डाऊनलोड झाली आहे.

या अपघताचा प्राथमिक अहवाल त्यांनी आणलेला आहे. केंद्र सरकारशी मी आज चर्चा केली. मंत्र्यांना विचारलं की, किती दिवसांत अंतिम अहवाल येणे अपेक्षित आहे. त्यांनी सांगितलं की, जानेवारीपूर्वी हा अहवाल येईल. हाच रिपोर्ट महत्त्वाचा आहे. हा रिपोर्ट आल्यानंतरच पुढे कार्यवाही होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, या अपघाताच्या तपासासाठी परदेशातील तज्ज्ञ, अमेरिकेतील एका एजन्सीलही आपण घेतले आहे. केंद्र सरकार आणि या सर्व तज्ज्ञांना विनंती केली आणि तज्ज्ञांनीही ती मान्य केलं आहे की, अजितदादांची पुण्यतिथी येईल, त्याच्या अगोदर तपासाचा रिपोर्ट यावा, अशी अपेक्षा आहे.

रिपोर्ट आल्यानंतरच सीबीआय असेल किंवा सीआयडी असेल. कारण सीआयडीही त्यावरच अडकले आहे. कारण विमान हवेत असताना काय घडलं, हे रिपोर्टशिवाय समजूच शकत नाही. धागेदोरे यातच मिळणार आहेत. आमचं आणि केंद्र सरकारचंही लक्ष आहे. केंद्र सरकारही योग्य पद्धतीने या सर्व गोष्टी करतंय, असा दावाही फडणवीस यांनी केला.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘एफआयआर’नंतर चार्जशीट तयार करावी लागतं. त्यासाठी चार्ज तयार करणं आवश्यक आहे. एफआयआरनंतर दोषी कोण आहे, हे आधी ठरवावं लागतं. ते एएआयबीचा अहवाल आल्याशिवाय शक्य नाही. विमानाच्या मालकावर चार्ज करायचं म्हटलं तरी अंतिम अहवाल लागणारच आहे.

आपल्या सर्वांची भावना महत्वाचीच आहे. पण कायदा भावनेवर चालत नाही. उद्या हे प्रकरण कोर्टात गेलं तर एका मिनिटात कोर्ट सांगेल की असं कसं काय तुम्ही केलं आणि मग चपराक बसेल आपल्याला. त्यामुळे मी पुन्हा सांगतो की, या प्रकरणाचं सत्य बाहेर आल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. काहीही झालं तरी ते सत्य बाहेर आणू, असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा बोलून दाखवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT