Gopinath Munde,Sanjay Raut sarkarnama
मुंबई

गोपीनाथ मुंडेंची शिवसेनेत यायची तयारी होती, पण..राऊतांचा गैाप्यस्फोट

सरकारनामा ब्युरो

पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी गेल्या रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीहिंदुत्वाच्या मुद्यांवर भाजपवर (bjp) प्रहार केला. शिवसैनिकांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी भाजपवर सडकून टीका केली. यावर भाजपचे नेते आक्रमक झाले. या मुद्यांवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे.

'सामना'च्या 'रोखठोक'मधून राऊतांनी भाजप नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्याबाबत संजय राऊतांनी गैाप्यस्फोट केला आहे. शिवसेना-भाजपचे संबध का बिघडले यावर राऊतांनी भाष्य केलं आहे.

''भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे संबंध कोणामुळे बिघडले? यावर एकदा प्रकाश पडायला हवा. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे असते तर संबंध इतके विकोपाला गेले नसते हे खरेच आहे. पक्षात उपेक्षा व घुसमट होत आहे या असंतोषाचा स्फोट होऊन श्री. मुंडे हे तेव्हा पक्ष सोडण्याच्या मनःस्थितीत होते. दिल्लीत येऊन त्यांनी भेटीगाठी घेतल्या. शिवसेनेत यायचीही त्यांची तयारी होती, पण 'गोपीनाथ, तू भाजप सोडू नकोस. दिवस बदलतील, लढत रहा,' असा सल्ला तेव्हा बाळासाहेबांनी दिला व मुंडे यांनी तो ऐकला,''असे राऊतांनी सांगितले.

''युतीधर्माचे हे तत्त्व जितके बाळासाहेबांनी पाळले तितके ते इतरांनी पाळले काय? यावर सांगण्यासारखे खूप आहे. पंचवीस वर्षे युती होती. त्या युतीत कुणाचे काय झाले या भूतकाळातून दोघांनीही बाहेर पडले पाहिजे. हिंदुत्व ही कुण्या राजकीय पक्षाचे मक्तेदारी असू नये. पण हिंदूंचा मर्दानी बाणा देशात फक्त बाळासाहेब ठाकरेच दाखवू शकले. अमरनाथ यात्रा होऊ देणार नाही असे अतिरेकी संघटनांनी धमकावताच त्या पाकड्या अतिरेक्यांना जाहीरपणे दम भरणारे व तुमची हाजला जाणारी विमाने उडू देणार नाही अशी तोफ डागणारे फक्त बाळासाहेब ठाकरेच होते. म्हणून ते हिंदुहृदयसम्राट होते,'' असे 'रोखठोक'मध्ये म्हटलं आहे.

''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भोवती व्यापाऱ्यांची भिंत आहे. मोदी यांनी भारतीय राजकारणाचा एक 'इव्हेंट' केला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला झळाळी आली हे खरेच. मोदी यांचे राजकारण उत्सवी स्वरूपाचे आहे. जगभरात राजकारणाचा असा उत्सव कधीच कोणी केला नसेल. मोदी यांच्या उदयानंतर महाराष्ट्रासह देशात भाजपला बळकटी आली. मोदी हेच भाजपचे एकमेव नेते आहेत. निवडणुकांच्या राजकारणात भाजपने यापूर्वी कधीच झाला नसेल इतका पैशांचा वापर सुरू केला, पण मोदी, शहा नव्हते तेव्हा प्रमोद महाजन हे एकमेव नेते होते,'' असे राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT