Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

२०२४ मध्ये पवारांच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : देशात वारंवार प्रश्न विचारण्यात येतो की, नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) विरोधात कोण उभारणार आणि भाजपला पर्याय काय आहे. पण, दोन वर्षांपूर्वी देशातील कोणत्याही व्यक्तीने स्वप्नातसुद्धा पाहिले नसेल असे घडले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार महाराष्ट्रात घडत येत असेल तर २०२४ मध्येसुद्धा देशात शरद पवारांच्या (sharad Pawar) नेतृत्वात सरकार बनेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला. पवारसाहेब, आज आपल्याला संघर्ष उभा करावा लागेल. कारण, संपूर्ण देश आपल्याकडे आशेने पाहत आहे, अशी विनंतीही त्यांनी केली. (Government will come under the leadership of Sharad Pawar in 2024 : Nawab Malik)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री मलिक बोलत होते. मलिक म्हणाले की, पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्याला काहीतरी संकल्प करण्याची गरज आहे. देशात आज वैचारिक लढाई लढण्याची गरज आहे. काहींना वाटतंय वेगळ्या विचारधारेच्या आधारे आपण देशात स्वतःला प्रस्थापित करू. पण, मला वाटतंय या वैचारिक लढाईत आमचा हा पवार नावाचा योद्धा नक्की जिंकेल आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहू. जिवंत मासे हे प्रवाहाच्या विरोधात पोहतात आणि मेलेले मासे हे प्रवाहाबरोबर वाहत जातात, त्यामुळे आपल्या सर्वांना आता संघर्ष करावा लागणार आहे.

काहीजण प्रश्न उपस्थित करतात, ममता बॅनर्जी वेगळे बोलतात आणि काँग्रेसवालेही दुसरेच बोलतात. पण, जे वेगवेगळे विचार मांडतात, त्या सर्वांना एकत्र करण्याचे काम शरद पवार आगामी काळात नक्की करतील. कश्मीरमधील फारुक अब्दुला, असो की पंजाबमधील अकाली दल, दिल्लीतील केजरीवाल असो की डावे किंवा दक्षिण भारतातील पक्ष असोत. ह्या सर्वांना एकत्र आणण्याचे काम आमचे नेते पवार करतील आणि सर्व पक्षाचे नेते पवारांचे ऐकतील. माझा एक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. आज मला एका पत्रकाराने सांगितले की पवारांच्या मनात काय चाललेले आहे, हे कोणाला समजत नाही. पण मला वाटतंय की जो कार्यकर्ता आपल्या नेत्याच्या मनातील गोष्ट ओळखू शकत नाही, तो सच्चा कार्यकर्ता आहे, असे त्यांनी समजू नये, अशा शब्दांत मलिक यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.

नवाब मलिक म्हणाले की, पवार हे भाजपबरोबर जाणार, अशा बातम्या येत असतात. राष्ट्रवादी स्थापना झाल्यावरही पवार उपपंतप्रधान बनणार आणि राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचे सरकार येणार, अशीही चर्चा रंगली होती. मी त्या वेळी समाजवादी पक्षात होतो, त्यावेळी आम्ही राष्ट्रवादीचे सहयोगी म्हणून काम करत होतो. पण मी तेव्हाही सांगितले होते की पवार हे विचाराशी कधीही तडजोड करणार नाहीत. त्यानुसार १९९९ मध्ये त्यांनी भाजपबरोबर न जाता काँग्रेसशी आघाडी केली. त्यानंतर मोदी पंतप्रधान झाल्यानंतरसुद्धा अशा चर्चा रंगल्या होत्या. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार. पण त्यावेळी मी सांगितले होते की ते अशक्य आहे. कारण माझ्या नेत्याच्या मनात काय आहे, हे मी ओळखून होतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT