devendra fadnavis | narendra modi sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : हरियाणातील दणदणीत विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,' नोव्हेंबर महिन्यांत महाराष्ट्रातही..'

Deepak Kulkarni

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत भाजपचं 400 पारचं स्वप्नं धुळीस मिळवत काँग्रेससह इंडिया आघाडीनं जोरदार मुसंडी मारली होती.या निकालानंतर भाजपला एनडीए तील घटक पक्षांसह सत्तास्थापन करावी लागली होती. त्यानंतर लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत हरियाणात भाजप तर जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसनं सत्ता काबीज केली आहे.

हरियाणातील दणदणीत विजयानंतर महाराष्ट्र भाजपचा प्रमुख चेहरा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आपली प्रतिक्रिया देताना विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. हरियाणा येथे भाजपने विजय मिळाल्यानंतर महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयमध्ये जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या उपस्थित हा जल्लोष करण्यात आला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सर्व कार्यकर्त्यांचं या विजयाबद्दल अभिनंदन करतो. जगभरातील लोकप्रिय नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हरियाणाच्या जनतेनं पुन्हा एकदा विश्वास दाखवला. पूर्ण बहुमताचं सरकार भाजप हरियाणात आलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मी सांगितलं होतं की, कोणत्याही विरोधी पक्षाकडून आम्ही हरलो नाही. कोणत्याही विरोधी पक्षात आम्हांला हरवण्याची ताकद नव्हती. या निवडणुकीत चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह. त्यानं आम्हांला हरवलं.

देशामध्ये आपण जिंकलो.पण आपल्या काही जागा कमी झाल्या.त्याचं कारण फेक नरेटिव्ह होतं. ज्या दिवशी ही गोष्ट आमच्या लक्षात आलं, त्यादिवशी आम्ही ठरवलं की, महाराष्ट्रासह देशभरात फेक नरेटिव्हचं उत्तर थेट नरेटिव्हने द्यायचं.ते आपण दिलं. त्यानंतर पहिली कसोटी ही हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये होती असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

'नऊ वाजताचा भोंगा तर रात्रीच...'

हरियाणाच्या निकालावरती आपले महाविकास आघाडीचे नेते कालरात्रीपासून स्क्रिप्ट घेऊन बसले होते. आम्ही जिंकणार, कोण काय बोलणार,नऊ वाजताचा भोंगा तर रात्रीच तयारीकरुन बसला होता.काय काय बोलू अन् काय काय नको. असं त्याला वाटत होतं.पण मला त्याला विचारायचं आहे, आता कसं वाटतंय असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाचे खासदार व नेते संजय राऊत यांना लगावला.

जनतेशी बेईमानी करुन निवडून आलेले हे लोकं, आता त्यांना जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे हरियाणामध्ये घडलं, तेच या महाराष्ट्रात येत्या नोव्हेंबर महिन्यांत घडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे.

साठ वर्षांनंतर एक पक्ष सलग तिसर्यांदा...

हरियाणात मागच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला 40 च जागा मिळाल्या होत्या.तर लोकसभेला दहा पैकी 5 जागा मिळाल्या होत्या.पण या निवडणुकीत आपण सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. थेट 50 जागा आपल्याला मिळतायत.जवळजवळ साठ वर्षांनंतर एक पक्ष सलग तिसर्यांदा हरियाणाची सत्ता काबीज करतो आहे.तो पक्ष म्हणजे तुमचा माझा भारतीय जनता पार्टी आहे.

खेळाडूंना घेऊन रान पेटवण्यात आले.पण या सर्वांना मतदारांनी नाकारले . देशातली जनता मोदींच्या पाठीशी आहे. राहुलबाबा विरोधी पक्षनेता झाल्यानंतर नाटक आणि नौटकी करत आहेत. राहुल गांधी यांना पहिली सलामी हरियाणाने दिली आहे. दुसरी सलामी महाराष्ट्र देणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये भारताची लोकशाही जिंकली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जम्मूमध्ये आम्ही निवडणुका घेतल्या. पाकिस्तान जे सांगत होते जम्मू काश्मीर भारतात नाही. पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक आम्ही घेतली. जम्मू काश्मीरमध्ये सरकार कुणाचे बनत हे महत्वाचे नाही.दोन्ही राज्यात ज्या पद्धतीने जनतेने समर्थन दिले. विजयाने आम्हाला अधिक काम करण्याचा आत्मविश्वास दिला आहे.फेक नरेटिव्ह वर एखादी निवडणूक जिंकता येते पण काम करून वारंवार निवडणूक जिंकता येते असंही त्यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT