Tanaji Sawant
Tanaji Sawant maharashtra Vidhanmandal
मुंबई

विरोधकांच्या प्रश्नांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांची उडाली फे फे!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानसभेत (Assembly) आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यावर प्रश्नांचा जोरदार भडिमार केला. उत्ताराची तयारी करून न आलेल्या सावंतांची विरोधकांच्या या प्रश्नांपुढे फे फे उडाली. पालघर (Palghar) जिल्ह्यातील हत्तीरोग प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्य मंत्री सावंत देऊ शकले नाहीत. विरोधकांची आक्रमकता पाहून अखेर हा प्रश्न राखून ठेवावा लागला. तसेच, बीड (Beed) जिल्ह्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याने विरोधकांनी विशेषतः विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आरोग्य मंत्र्यांना सुनावले. तो शब्दही अखेर पटलावरून काढून टाकण्यात आल्यानंतर विरोधक शांत झाले. अनेक प्रश्नावर माझ्याकडे सध्या आकडेवारी नाही, माहिती घेऊन सांगतो, असा बचावत्मक पवित्रा सावंत यांना घ्यावा लागला. (Health Minister Tanaji Sawant was put in a dilemma by the opposition on second day of session)

विरोधी पक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, विजय वडेट्टीवार, राजेंद्र शिंगणे, प्रकाश सोळुंके, सुनील प्रभू, भारती लव्हेकर, श्रीनिवास वानगा यांनी आरोग्याच्या संदर्भात विविध प्रश्नांचा भडिमार करत आरोग्य मंत्री तानाजी सावांतांना अक्षरशः भंडावून सोडले. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्य मंत्री सभागृहाला देऊ शकले नाहीत, त्यामुळे विरोधक आक्रमक झाले.

याच मुद्यावर एरव्ही शांत असणारे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटीलही आक्रमक झाले. प्रश्न गंभीर असताना त्यावर योग्य उत्तर येत नाही, असे म्हणत नाराजी व्यक्त केली. त्यानंतरही तासाभरात त्याचे उत्तर घेऊ, असे विधानसभा अध्यक्षांनी सांगताच वळसे पाटील यांनी उठून उभे राहत ‘नवीन पायंडा पाडला जात आहे. एकतर आता उत्तर दिले पाहिजे किंवा हा प्रश्न राखून ठेवला पाहिजे, अशी सूचना केली.

योग्य उत्तर मिळत नसल्याने विरोधी पक्षनेते पवार हे अक्षरशः चिडले. आम्ही ३०-३० वर्षे सभागृहात काम करत आहे. विधानसभा अध्यक्षांनीही तुमच्या लक्षात आणून देऊनसुद्धा मुद्यावर उत्तर मिळत नाही, असे सांगून ‘एक तर प्रश्नावर उत्तर मिळत नाही आणि प्रश्नही राखून ठेवला जात नाही,’ असे अजितदादांनी सुनावले. राजेंद्र शिंगणे यांचे मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने त्यांनी पुन्हा प्रश्न विचारत आरोग्य मंत्र्यांना धारेवर धरले.

हत्तीरोगासंदर्भात आरोग्य मंत्र्यांनी तासाभरात उत्तर देण्याचे मान्य केले. पण विधानसभा अध्यक्षांनी सूचना करत विरोधी पक्षांना जी उत्तरे अपेक्षित आहेत, त्याची नीट माहिती घ्या. आपण हा प्रश्न राखून ठेवू, असे सांगितले. त्यानंतर पुढील कामकाजास सुरुवात झाली.

शिवसंग्रामच्या आमदार भारती लव्हेकर यांनी बीड येथील स्त्रीभ्रूहण हत्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना बीड जिल्हा स्त्रीभ्रूण हत्येसाठी प्रसिद्ध आहे, असा उल्लेख केला. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी बीड जिल्हा स्त्रीभ्रूण हत्येसाठी प्रसिद्ध आहे, असं विधान आमदार लव्हेकर यांनी केला. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी त्याचा उल्लेख केला. त्यावर अजित पवार म्हणाले की, मंत्र्यांनी संबंधित सदस्यांना समाजवून सांगायला पाहिजे होते. मंत्र्यांकडून तसा उल्लेख म्हणजे संपूर्ण बीड जिल्ह्याचा अपमान आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी तो शब्द कामकाज पटलावरून काढल्याचे स्पष्ट केले. या वेळी प्रकाश सोळंके यांनीही यासंदर्भात प्रश्न विचारला.

लिंगोत्तर प्रमाणाबाबत राजेश टोपे यांनी विचारलेल्या प्रश्नावरही आरोग्य मंत्री सावंत यांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. आपण या खात्याचा मंत्री राहिलेला आहात. लिंगोत्तर प्रमाणाची आकडेवारी सध्या माझ्याकडे नाही. दोनच दिवसांपूर्वी मी या खात्याचा चार्ज घेतलेला आहे. पण, लिंगोत्तर प्रमाण वाढण्यासाठी आपण जनजागृती करणार आहोत, असे सावंत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT