Sameer Wankhede
Sameer Wankhede Sarkarnama
मुंबई

समीर वानखेडे अडचणीत! उच्च न्यायालयाचं तपासावरच प्रश्नचिन्ह

सरकारनामा ब्युरो

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs case) प्रकरणी आर्यन खानसह (Aryan Khan) मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट या तिघांना उच्च न्यायालयाने (High Court) जामीन दिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत आज मिळाली आहे. यात या प्रकरणाच्या तपासावरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. यामुळे अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) अडचणीत आले आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशात एनसीबीकडे कोणतेही पुरावे नसल्याची बाब अधोरेखित करण्यात आली आहे. आदेशात म्हटले आहे की, आर्यन, अरबाझ आणि मुनमुन यांच्या विरोधात त्यांनी अमली पदार्थांसाठी कट आखल्याचे कोणेतेही पुरावे नाहीत. याचबरोबर त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्येही काही आक्षेपार्ह आढळलेले नाही. या आरोपींनी समान हेतू ठेवून बेकायदा कृत्य केल्याचा एकही पुरावा न्यायालयासमोर आलेला नाही. ते तिघे एका क्रूझमधून प्रवास करीत होते म्हणून त्यांना कटाचा भाग ठरवणे शक्य नाही. तसेच, तिघांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नव्हती. त्यामुळे संबंधित वेळी त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केले होते हेसुद्धा स्पष्ट होत नाही.

तपास अधिकाऱ्यांनी आरोपींच्या घेतलेल्या कबुलीजबाबावर एनसीबी विसंबून राहू शकत नाही. कारण हे कबुलीजबाब न्यायालयात ग्राह्य धरले जात नाहीत, असेही उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. उच्च न्यायालयानेच आता एनसीबीच्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणारे समीर वानखेडे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांच्याकडून हा तपास सध्या काढून घेण्यात आला आहे. तसेच, त्यांची खातेअंतर्गत चौकशी सुरू आहे.

अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (NCB) आर्यनला 3 ऑक्टोबरला पकडले होते. तो 8 ऑक्टोबरपासून आर्थर रोड कारागृहात होता. आर्यनसह तिघांच्या जामिनावर तीन दिवस उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. आर्यनच्या वतीने माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. रोहतगी हे आर्यनची बाजू मांडणार असल्याचे सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर तीन दिवसांच्या सुनावणीनंतर आर्यनसह तिघांना जामीन मिळाला आहे. अखेर 30 ऑक्टोबरला आर्यनची कारागृहातून सुटका झाली होती. मुनमुन आणि अरबाझ यांची 31 ऑक्टोबरला कारागृहातून सुटका झाली होती.

उच्च न्यायालयात सलग तीन दिवस आर्यनसह तिघांच्या जामिनावर सुनावणी सुरू होती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांनी आर्यन, मुनमुन आणि अरबाझ या तिघांना 28 ऑक्टोबरला जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाचा जामिनाचा आदेश मिळाल्यानंतर तिघांची कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा होणार होता. आर्यन आणि अरबाझ हे आर्थर रोड कारागृहात तर मुनमुन भायखळा महिला कारागृहात होता. न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर दोन दिवसांनी आर्यनची तर मुनमुन आणि अरबाझची 3 दिवसांनी सुटका झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT