Navneet Rana and Ravi Rana
Navneet Rana and Ravi Rana Sarkarnama
मुंबई

नवनीत राणांना प्यायला पाणीही नाही? गृहमंत्री वळसे पाटलांनी थेट चौकशी करूनच दिलं उत्तर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : 'मातोश्री'विरोधात पंगा घेणाऱ्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे सध्या तुरुंगात आहेत. नवनीत राणा या दलित असल्यानं तुरुंगात अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांनाही पत्र लिहिले होते. या आरोपांची चौकशी करून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी उत्तर दिले आहे. खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीत वस्तुस्थिती नाही नाही. याबात लोकसभा अध्यक्षांना राज्य सरकार माहिती देणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी केली आहे. त्यात कोणतीही वस्तुस्थिती नाही. लोकसभा अध्यक्षांनी याबाबत माहिती मागवली आहे. ती माहिती राज्य सरकार देईल. पोलीस कायद्यानेच काम करत असून कायद्याच्या बाहेर कोणतेही काम करत नाहीत. मुंबई पोलीस उत्तम काम करत असून कायद्याप्रमाणे त्यांना जे योग्य वाटते, त्यावर ते कार्यवाही करत आहेत.

मागास वर्गातील असल्यामुळे तुरुंगात हीन दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप नवनीत राणांनी केला आहे. याबाबत त्यांनी थेट लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले होते. या पत्रावर लोकसभा सचिवालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाला आदेश देऊन 24 तासांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. लोकसभा सचिवालयानं याबाबत महाराष्ट्र सरकारकडे माहिती मागितली आहे. आज संध्याकाळी याबाबतचा अहवाल मुख्य सचिव लोकसभा सचिवालयाकडं सादर करणार आहेत.

नवनीत राणांच्या आरोपांना फडणवीसांनी दुजोरा दिला होता. ते म्हणाले होते की, नवनीत राणा यांना तुरुंगात हीन दर्जाची वागणूक दिली जात आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत राणांना पिण्याचं पाणीही देण्यात आलेलं नाही. एवढंच नव्हे तर त्यांना वॉशरुमलाही जाऊ दिलं नाही. हे अतिशय धक्कादायक आहे. राणांना तुरूंगात दिली जाणारी वागणूक लोकशाहीला काळिमा फासणारी आहे. आता लोकशाहीबद्दल ओरडणारे कुठे आहेत? नवनीत राणा यांना देण्यात येत असलेल्या वागणुकीबद्दल त्यांनी वकिलांच्यामार्फत लोकसभेच्या अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. हनुमान चालिसा म्हणण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून एका खासदाराला अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमान चालिसा म्हणणे राजद्रोह असेल तर तो आम्ही रोज करायला तयार आहोत.

राणा दांपत्याला 23 एप्रिलला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना 24 एप्रिलला त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर आणखी काही गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी विविध मुद्दांवर पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने राणा १४ दिवसांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर राणा दांपत्याच्या वकिलांनी लगेच जामिनासाठी अर्ज केला. पण न्यायालयाने त्यावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. या अर्जावर 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यानंतर राणा दापत्यांनं सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सत्र न्यायालयानेही राणा दांपत्याला तातडीनं जामीन देण्यास नकार देत २९ एप्रिला सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT