Aditya Thackeray
Aditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Aditya Thackeray : शिंदेंच्या शिवसेनेची गद्दार गँग अशी संभावना; आदित्य ठाकरे भडकले, म्हणाले...

सरकारनामा ब्युरोे

Attack on BJP Party Worker : दहीसर येथे भाजपच्या बिभीषण वारे या कार्यकर्त्यावर शिवसेनेच्या ५० हून अधिक जाणांनी जीवघेणा हल्ला केला. यात वारे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची पोलिसांकडून दखल घेतली नाही. तसेच त्यांना रुग्णालयातही दाखल करून घेतले नाही. या प्रकारावरून विरोधकांनी आज विधीमंडळात सत्ताधारी शिवसेनेवर हल्लाबोल केला. यावर आदित्य ठाकरे यांनी भाजपवर प्रश्नांची सरबत्ती करून त्यांनी सत्तेतून बाहेर पडले पाहिजे, असे आवाहन केले.

आदित्य ठाकरे यांनी विधीमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींसह घटनेची दखल न घेणाऱ्या पोलिसांवरही कारवाईची मागणी केली. रुग्णालयात दाखल करून घेतले नसल्याचे त्याचीही चौकशीची मागणी केली. गृहखाते मुख्यमंत्र्याच्या दबावाखाली काम करते का? असा परखड सवालही उपस्थित केला.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, "यापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्याला हात लावला तरी सर्व यंत्रणा तुटून पडायची. काल रात्री झालेल्या मारहाणीत भाजपच्या कार्यकर्त्याला १९ टाके पडले आहेत. त्यानंतरही पोलिसांनी किरकोळ मारहाण अशी तक्रार घेतली. मारहाण करणाऱ्या ५५ लोकांवर कारवाई झालेली नाही. गृहमंत्रालयाकडून काही म्हणणे आलेले नाही. कारवाई न करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झालेली नाही. यातून गृहखाते मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करीत असल्याचे स्पष्ट होत आहे."

भाजपच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला होऊनही काही कारवाई होत नसेल तर भाजपने सत्तेतून बाहेर पडले पाहिजे, असे ठाकरेंनी सांगितले. ते म्हणाले, "मारहाण करणारे कार्यकर्ते कुणाचे आहेत हे जगजाहीर आहे. त्यामुळे आमच्यावर सूड काढण्यासाठी भाजप किती दिवस गद्दार गँगला पोसणार? भाजपच्या कार्यकर्त्यांनी मार खाल्ल्यानंतर आज भाजपने सरकारमधून बाहेर पडायला पाहिजे होते. सरकारचा पाठिंबा काढायला पाहिजे होता. भाजपवर ही परिस्थिती कुणी आणली? हे भाजपला पटतेय का? याकडे दुर्लक्ष करून फक्त सत्तेत बसायचे का? खुर्चीवर टिकून राहायचे हीच राज्यातील भाजपची भूमिका असेल तर मान्य करतो."

ठाकरे यांनी राज्यात गेल्या सात वर्षात असे वातावरण नव्हते म्हणत शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे म्हणाले, "यापूर्वीही गद्दार आमदारांनी टेबल जामीन करून देतो असे सांगून बेदम मारहाण करण्यास सांगितले होते. दुसऱ्या गद्दार आमदारांनी पोलिसांवर गोळी चालविली. त्यानंतर सांगितले की बंदूक त्यांची होती पण गोळी दुसऱ्याने चालविली. तोही गुन्हाच आहे. गद्दारांच्या गँगमुळेच राज्यात गँगवॉरसारखे प्रकार सुरू झाले आहेत. सध्या राज्यातील कायदा सुवस्थेचे धिंडवडे उडत आहेत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT