Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar : पवारांच्या भूमिकेने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित; म्हणाले, "तुमच्या भावना दुर्लक्षित होणार नाहीत !"

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar talk with NCP Activist : शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगती' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन मुंबईत मंगळवारी (ता. २) पार पडले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले होते. पवारांच्या या निर्णयाला राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. ते आपला निर्णय मागे घेणार नाही, तोपर्यंत आम्ही वाय. बी. सेंटरवर बसून राहू, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानंतर पवार यांनी आज पुन्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधून दोन दिवसात अंतिम निर्णय घेऊ, असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पवारांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्ते तीन दिवसांपासून वाय. बी. सेंटर परिसरात बसून होते. दरम्यान, राष्ट्रवादी पक्षातील समितीने तीन दिवसात आपला निर्णय जाहीर करू, असे सांगितले होते. त्यानंतर गुरुवारी (ता. ४) शरद पवार (Sharad Pawar) यांनी वाय.बी. सेंटर परिसरात येत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तसेच त्यांच्यासाठी रक्ताने लिहिलेले पत्रही पवार यांना देण्यात आले. तसेच पवारांनी आपला निर्णय मागे घेतला नाही तर ६ मेपासून आमरण उपोषण करण्याचाही इशारा कार्यकर्त्यांनी दिला होता.

पवारांनी यावेळी आपण अध्यक्ष पद सोडण्याचा का निर्णय घेतला याबाबत सांगितले. ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भवितव्याचा विचार करूनच मी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाबाबत मी तुमच्याशी चर्चा करायला हवी होती. मात्र तुम्ही नकारच दिला असता, याची मला कल्पना होती. त्यामुळे मी हा निर्णय स्वतः घेतला."

यावेळी पवार यांनी कार्यकर्त्यांच्या तीव्र भावनांचा विचार करून दोन दिवसात अंतिम निर्णय जाहीर करू, असे सांगितले. पवार म्हणाले, "माझ्या निर्णयानंतर राज्यभरातून अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. कार्यकर्त्यांच्या भावनांचा मला आदर आहे. राज्यातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या तीव्र भावानांचा विचार करून मी दोन दिवसात अंतिम निर्णय जाहीर करतो. त्यानतंर कुणालाही वाय. बी. सेंटरवर (Mumbai) उपोषणाला बसावे लागणार नाही."

पवारांनी दोन दिवसानंतर कुणालाही वाय.बी. सेटंरवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असे आश्वस्त केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून पवारांच्या निर्णयाचे स्वागत केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT