Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : चोरलेला धनुष्यबाण घेऊन पोटनिवडणुकीत या; आम्ही मशाल घेऊन येतो, ठाकरेंचे शिंदे-फडणवीसांना आव्हान!

सरकारनामा ब्युरो

By Election : महाविकास आघाडी सरकार होते, त्यावेळी तीन चाकांची रिक्षा म्हणून टीका केली जात होती. आता म्हणतात की राज्यात डबल इंजिनचे सरकार आले आहे. मात्र हे इंजिन काहीही करीत नाही. ते हवेत फक्त धुरांच्या रेषा सोडत आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.

चिंचवड आणि कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्राचसभेत ऑनलाईन भाषण केले. यावेळी त्यांनी निवडणूक लागल्यापासून भाजपच्या भूमिकेचा समाचार घेतला.

ठाकरे म्हणाले, "भाजपने ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती. त्यासाठी कसब्यात त्यांनी टिळकांच्या घरात उमेदवारी द्यायला हवी होती. तसेच भाजप ज्या पद्धतीने वागत आहे, त्यामुळे त्यांना सहानुभूती मिळता कामा नये, अशी भूमिका घेतली. त्यामुळे चिंचवडलाही महाविकास आघाडीने उमेदवार दिला."

यानंतर भाजप (BJP) किती क्रूर आहे, याची उदाहरणे ठाकरे यांनी दिली. ते म्हणाले की, "भाजपने टिळकांच्या कुटुंबाचा फक्त वापर केला. नाकात ऑक्सिजनच्या नळ्या असतानाही खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांना प्रचारात उतरविले. त्यांना स्वतःच्या पक्षाताही कुणी स्पर्धक नकोय. त्यामुळेच त्यांनी एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) बाजुला केले. हा अमानुषपणा कुठून आला?"

ठाकरे यांनी यावेळी लोकशाहीबाबतही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "आता त्यांना मिळालेल्या आमदारांवरही चौकशांचे आदेश दिले होते. मात्र ते त्यांना जाऊन मिळाले की चौकशी थांबल्या. विरोध केला म्हणून त्यांनी शिवसेना पक्ष चोरला. चिन्ह चोरले. चिंचवड येथे प्रचार करताना सचिन भोसलेंवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. तुमच्या सोबत आले की धुतल्या तांदळासारखे, नाहीतर तांदळातील खड्यासारखे! विरोधकांना संपविण्याचे कारस्थान केले जातात. हीच का तुमची लोकशाही?"

शेवटी त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील (PCMC) भ्रष्टाचाराबाबत भाजपला प्रश्न विचारले. ठाकरे म्हणाले की, "आम्ही महानगरपालिकेत भ्रष्टाचार केला नाहीतरी भाजप बोंब करते. त्यांच्या काळात तर स्थायी समितीचे अध्यक्षच भ्रष्टाचाराच्या आरोपात सापडले होते. महानगरपालिका आमदारांनी धुतली. अनेक पातळीवर पालिकेत भ्रष्टाचार झाला. त्या सर्वांची चौकशी का करीत नाही? शहरातील पाण्याचा प्रश्न अद्याप सुटला नाही. त्यांना शेतकऱ्यांच्या पाच गुंठ्यांचा परतावा देण्याचे वारंवार अश्वानस दिले जाते."

ठाकरे यांनी कसल्याही स्थितीत भाजपला मतदान होता कामा नये, असे आवाहन शिवसैनिकांना केले. तसेच तुम्ही चोरलेला धनुष्यबाण घेऊन या, आम्ही मशाल घेऊन येतो, असे ठाकरे यांनी पुन्हा शिंदे-फडणवीस यांना आव्हान केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT