Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Shinde-Fadnavis-Pawar Govt: 'तीन तिघाडा, काम बिघाडा' सव्वा महिन्यांतच शिंदे-फडणवीस अजितदादांमध्ये कुरबुरी ?

उत्तम कुटे: सरकारनामा

Maharashtra Politics: तीनचा आकडा हा तसा अशुभच मानला जातो.त्यातूनच `तीन तिघाडा,काम बिघाडा` असं बोललं जातं. महाराष्ट्रातील पूर्वीचे महाविकास आघाडीचे तीन पक्षांचे सरकार हे अंतर्गत कुरबुरी आणि मतभेदांतून निम्मीच टर्म पूर्ण करू शकले. नंतर आलेल्या महायुतीचे तीन पक्षांचे सरकारही तीनच्या शापातून मुक्त झाल्याचे दिसत नाही. कारण सव्वा महिन्यांतच त्यांच्यात कुरबुरी सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट गेल्या महिन्यात दोन तारखेला राज्य मंत्रीमंडळात सामील झाला. त्यानंतर जेमतेम सव्वा महिन्यातच या तीन पक्षांच्या (भाजप-शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)राज्य सरकारमध्ये कुरबुरी सुरु झाल्या आहेत. त्याला निमित्त ठरले आहे पालकमंत्री पदाचे वाटप. ते ही मंत्रीमंडळ विस्तारासारखेच रखडल्याने १५ ऑगस्टला कुणी, कुठे झेंडावंदन करायचे यावरून महायुतीत सुप्त मतभेद सुरु झाले आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री सबंधित जिल्ह्याच्या मुख्यालयात स्वांतत्र्यदिनी आणि प्रजासत्ताकदिनी झेंडावंदन करतात.पण,या वादामुळे यावर्षीचा स्वातंत्र्यदिन त्याला अपवाद ठरला आहे. कारण काही जिल्ह्यात पालकमंत्री हे झेंडावंदन करणार नसून ते दुसऱ्याच जिल्ह्यात करणार आहेत. पुणे जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यात झेंडावंदन करणार असल्याचे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने ८ ऑगस्टला जाहीर केले होते. पण,त्यावरून वाद सुरु झाला.

पुणे जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात झेंडावंदन करावे,अशी मागणी पुढे आली.त्यावर तोडगा म्हणून आता चंद्रकांत पाटील हे पुण्यात झेंडावंदन न करता रायगड जिल्ह्याचे हेडक्वॉर्टर असलेल्या अलिबाग येथे झेंडावंदन करतील. तर, पुण्यात राज्यपाल रमेश बैस हे झेंडावंदन करतील,असे आता नव्याने ठरले आहे. असाच वाद असलेल्या काही जिल्ह्यात हा बहूमान स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.हा तो़डगा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काही बैठका घ्याव्या लागल्या.

१३ महिन्यांपूर्वी राज्यातील आघाडी सरकार पडल्यानंतर भाजप आणि शिंदे शिवसेना युतीचे सरकार आले. त्यांच्यात सारे काही अलबेल नसल्याचे लगेच दिसून आले होते.मंत्रीमंडळ विस्तारावरून त्यांच्यातील कुरबुरी आणि मतभेद देखील समोर आले होते. हा विस्तार होऊन त्यांच्यातील कुरबुरी थांबण्यापूर्वीच राज्य सरकारमध्ये तिसरा पार्टनर राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हा २ जुलैला सामील झाला. त्यांचे नऊ आमदार थेट कॅबिनेटमंत्री झाले. त्यामुळे मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी कोट शिवून बसलेले शिवसेना, भाजपचे आमदार तसेच राहिले.

२ जुलैच्या झालेल्या दुसऱ्या राज्य मंत्रीमंडळ विस्तारानंतर सव्वा महिन्यानंतरही पालकमंत्री जाहीर न झाल्याने तिन्ही पक्षांत कुरबुरी सुरु झाल्या आहेत. कारण त्यांच्या मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाचा मान घ्यायचा आहे.मात्र, हे पदच जाहीर न झाल्याने कुठल्या मंत्र्यांने कुठल्या जिल्ह्यात झेंडावंदन करायचे यासाठी फडणवीस-पवारांनी बैठका सत्र आरंभले आहे.अगोदरच मंत्रीमंडळ विस्तारावरून दोन पक्षांत (भाजप-शिवसेना) सुरु असलेली कुरबूर आणि मतभेद आता सत्तेतील तिन्ही पक्षांत (भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी) पालकमंत्रीपदावरून सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

Edited By : Rashmi Mane

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT