Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

‘जयंतराव, असे ऑपरेशन करतात की दुखतही नाही अन्‌ कळतही नाही!’

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अजितदादा (Ajit Pawar) रोखठोक बोलतात. पण हे (जयंतराव) जे ऑपरेशन करतात ना, माणसाला दुखतपण नाही आणि कळतपण नाही. सगळं काढून घेतात; पण ते माहितीसुद्धा होत नाही. अभ्यासपूर्ण भूमिका मांडण्याची जयंतरावांकडून अपेक्षा होती. पण, त्यांनी आम्हाला नुसतेच टोमणे मारले, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या भाषणाला उत्तर दिले. (Jayantrao, performs such operations that it does not hurt and is not felt : Eknath Shinde)

अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषण खोडून काढले. ते म्हणाले की, अंतिम आठवडा प्रस्तावावर राज्यातील जनतेला काय पाहिजे, हे मांडले पाहिजे. अजितदादांनी ते मांडलं. आम्ही शेतकऱ्यांना मदत केली. आम्ही केलेल्या चांगल्या कामाला दादा, तुम्ही प्रतिसाद दिला पाहिजे. तेवढ्यात जयंत पाटील यांनी बाक वाजवले. ते मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले, तेव्हा ते म्हणाले की, ते आज वाजवत आहेत. पण काल बरोबर आपल्या विरोधात वाजवत (भाषण) होते. गोड बोलून, हसवत हसवत आपल्या विरोधात बोलत होते. मंत्रिमंडळाचं खातंवाटपही त्यांनी असंच केलं असावं.

अभ्यासपूर्ण भूमिका मांडण्याची जयंतरावांकडून अपेक्षा होती. पण त्यांनी आपल्या नुसतेच टोमणे मारले. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आम्ही केली, त्यात नेते, उपनेते सर्वजण आले. त्यामुळे तुम्हाला नेते, उपनेते बनवलं की काय? असं काल मला वाटतं होतं. त्या हिशेबाने काल तुम्ही एकदम जोरदार बोलत होते. आता ते राष्ट्रीय प्रवक्त्याची जागा घेतात की काय, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी या वेळी बोलताना केला.

मुख्यमंत्री म्हणाले की, आमच्या माजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या धोरणांचे जाहीर वाभाडे काढले आहेत, तिकडं बसलेले असल्यामुळे तुम्ही विसला असाल. पण ठीक आहे. आपण म्हणाला की दिल्लीत मुख्यमंत्री पाचव्या रांगेत उभे हेाते. पण, ते सांगताना मी दिल्लीत काय काय मुद्दे मांडले, हे सांगितले असते तर बरं वाटलं असतं. राष्ट्रपती अभिभाषणाच्या वेळी मी पहिल्या रांगेत होतो. पण फोटो काढताना मागे गेलो, तर कमीपणा वाटण्याचे कारण नाही. रांग महत्वाची नाही; काम महत्वाचे आहे. देशाच्या प्रमुखाला भेटायला जाताना रांग काय पाहायची आहे. विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला दिली आहे. काही जण म्हणतात की एकनाथ शिंदेंनी दिल्लीतच ऑफिस काढले आहे.

जयंतराव, तुम्ही ते अजितदादांना विचारलं का?

तुम्ही मला ऑफर दिली की, तुम्ही या इकडं, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो. पण जयंतराव तुम्ही मला सांगा, तुम्ही हे दादांना विचारलं का? विरोधी पक्षनेता तुम्हाला व्हायचं होतं, ते तरी झालेत का तुम्ही? हे खरं आहे की नाही. कालच्या भाषणातून ते सर्व दिसत होतं. असू द्या. पण दादा दादा आहेत, त्यांची दादागिरी हमेशा चलेगी. हमारे वो मित्र है। तुम्हीही मित्र आहात. तुम्ही मला काल सांगितलं आपण एकमेकांच्या फार जवळ होतो. तुमचं काम मी कधी केले नाही. प्राजक्तला पूर्ण अधिकार द्या म्हणाले, ते देऊन टाकले. तसे तुम्ही मनाने चांगले आहेत. वातावरण हलेक फुलके व्हायला पाहिजे होते. पण ते करताना आम्हाला बोचेल असेच बोलत होते, अशी खंतही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT