Jitendra Awhad-Raj Thackeray
Jitendra Awhad-Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

'शिवाजी पार्कमध्ये सभा होती, त्यावेळी राज ठाकरे छत्री घेऊन उभे होते काय?'

सरकारनामा ब्यूरो

नवी मुंबई : एवढं दिवस सभा घेताना त्यांना काय पाऊस वाटत होता काय? शिवाजी पार्कमध्ये, बाकी ठिकाणी त्यांनी सभा घेतली, तेव्हा काय ते छत्री घेऊन उभे होते काय?, अशा शब्दांत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पावसातील सभेच्या वक्तव्याला उत्तर दिले. (Jitendra Awhad's reply to Raj Thackeray who criticized Sharad Pawar)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचच्या सभागृहात सभा झाली. त्यावेळी त्यांनी ‘सध्या कोणत्याही वेळेला पाऊस पडेल, अशी चिन्ह आहेत. त्यातच सध्या निवडणुका नाहीत, काहीच नाही; मग उगाच कशाला पावसात भिजत भाषण करायचं.’ असे वक्तव्य करत शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेचा संदर्भ देत टीका केली होती. त्याला आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले. आव्हाड म्हणाले की, राज ठाकरे यांच्या भाषणाला काही अर्थच उरलेला नाही. त्यात काही मटेरियल नसते. बोलायचं म्हणून ते बोलतात. लोक ऐकायला जातात, कारण कॉमेडी शो प्रत्येकालाच आवडतो.

अयोध्या दौऱ्याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या विरोधात सापळा रचला, असा आरोप केला होता. त्याबाबत आव्हाड म्हणाले की, कोणी सापळा रचला, कोणी काय केलं, हे त्यांचं त्यांनाच माहीत. आम्हाला त्या वादात पडायचं नाही. अयोध्येला जाणार म्हटल्यावर आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. दौरा रद्द करताना आपली तब्येत बरी नसल्याचे सांगितले, त्यावेळी आम्ही देवाला विनंती केली की त्यांची तब्येत बरी होऊ दे. एकदा त्यांना रामाचं दर्शन घेऊनच येऊ दे. तुम्ही अयोध्याला जावा अथवा नका जाऊ. तुम्ही कुठे जाताय, काय करताय याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही.

आव्हाड म्हणाले की, अफझल खान, औरंगजेब, भोंगा ह्याच्यापेक्षा महत्वाचे पेट्रोल, डिझेल, गॅसची वाढलेली किंमत आहे, बेरोजगार झालेली तरुण पोरं, त्याच्यावर बोलूयात. सुमारे ३०० वर्ष ३५० वर्ष जुना इतिहास पोखरून निष्कारण आगी लावण्याचा काम करू नये. तुमच्या भोंग्याचं राजकारण झालं. पण, मला राज्यातील जनतेचा अभिमान वाटतो. महाराष्ट्र धर्म जागा झाला आणि त्यांनी ओळखलं की हे फक्त दंगली घडविण्यासाठी करताहेत, त्यामुळेच ३ तारखेला काहीही झालं नाही.

राज ठाकरे यांच्या त्या एका कृत्यामुळे मात्र महाराष्ट्रातील हिंदू धर्माच्या काकड आरत्या बंद झाल्या. रात्रीची कीर्तनं, प्रवचनं बंद झाली. तुम्ही मारायला गेले कोण आणि मेले कोण, याचा जरा विचार करा. मला अभिमान वाटतो या महाराष्ट्राच्या मातीचा की या मातीमध्ये जो धर्म आहे, तो जागा झाला आणि तो यांच्या जाळ्यात फसला नाही, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT