Navi Mumbai Municipal Corporation Sarkarnama
मुंबई

Ganesh Naik: मुख्यमंत्री शिंदे अन् भाजप आमदारामध्ये संघर्ष पेटला!

Mangesh Mahale

कल्याण-डोबिंवलीतील 14 गावांचा नवी मुंबई महानगर पालिकेत (Navi Mumbai Municipal Corporation) समावेश करण्यात आला आहे. यावरुन महायुतीत वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. ही चौदा गावे नवी मुंबईमध्ये समविष्ट करण्याच्या निर्णयाला भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी विरोध केला आहे.

एकनाथ शिंदे आणि नाईक यांचं विळ्याभोपळ्याचं नातं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी ठाण्याची जागा शिंदेसेनेला सुटल्यानं नाईक नाराज झाले. त्यांनी विषय राजीनाम्यापर्यंत नेल्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर नाराज असल्याचं समजतं.

समाविष्ट गावांना वेगळा स्वतंत्र्य निधी द्यावा, अशी मागणी गणेश नाईक यांनी केली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे या गावावरुन महायुतीत भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे चित्र आहे.

14 गावांची नागरिक मला भेटायला येणार आहे, काही जणांनी या गावांसाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न करावा, त्यांनी पाठपुरावा करुन या गावांना निधी आणावा, त्यांनी कुणी रोखलं,असा सवाल मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.

नवी मुंबई महापालिकेत 14 गावांचा समावेश होणार असल्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हा या गावातील ग्रामस्थांनी फटाके उडवले होते. पेढे भरवरुन आनंद साजरा केला होता. मनसे आमदार राजू पाटील आणि गाव विकास समिती यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आल्याचे गावकऱ्यांचे मत आहे.

नवी मुंबई महानगर आयुक्त कैलाश शिंदे यांनी चौदा गावांमध्ये विकास कामे करण्याचा आराखडा बनवला आहे. यासाठी महानगर पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 14 गावांच्या मालमत्ता हस्तांतरणाच्या कामाला सुरुवात झाली असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे दिली आहे.

यापूर्वी 2000 मध्ये ही चौदा गावे नवी मुंबई पालिकेत होती. मात्र, महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या कर आकारणीला विरोध करीत 14 गावांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.यानंतर गावांचा विकास न झाल्याने अखेर परत एकदा नवी मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारित येण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता.

गणेश नाईक ऐरोलीचे आमदार आहेत. तर मंदा म्हात्रे बेलापूरच्या आमदार आहेत. गणेश नाईक यांना ऐरोलीतून पुन्हा एकदा विधानसभेची उमेदवारी हवी आहे. पण हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. येथून शिंदेसेनेचे विजय चौगुले यांचं तिकीट जवळपास निश्चित मानलं जात आहे.

ही आहेत ती 14 गावे

नवी मुंबई पालिकेत नव्याने समावेश झालेल्या कल्याण तालुक्यातील 14 गावांची नावे खालीलप्रमाणे आहेत. यामध्ये मोकाशी, गोठेघर, बाळे,वाकळण, उत्तरशिव, नागांव, निघु, नावाळी, दहीसर , पिंपरी, वालीवली, नारिवली, भंडार्ली, बाभळी या गावांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT