Kalyan murder case police investigation details Sarkarnama
मुंबई

Kalyan Murder Case: रक्ताचे डाग, एक इंजिनीअरिंग स्टुडंट अन् हत्येचे अजब कारण! वाचा नेमकी कल्याणमधील मर्डर मिस्ट्री काय?

Engineering student murder case in Kalyan: कल्याणमध्ये घडलेल्या रहस्यमय हत्या प्रकरणाच्या ठिकाणी आढळलेले रक्ताचे डाग; इंजिनीअरिंग विद्यार्थ्याच्या मृत्यूमागील कारणाचा पोलीस तपास सुरू.

Rashmi Mane

Engineering student was murdered in Kalyan: कल्याण परिसरात घडलेल्या एका गूढ हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण भागात खळबळ उडवली आहे. काही दिवसांपूर्वी टिटवाळा परिसरातील गोवेली रस्त्यावर रक्ताने माखलेली एक उबेर कार आढळून आली होती.

ही कार पाहून स्थानिक नागरिकही घाबरले होते. गाडीत रक्ताचे डाग असल्याने मोठा गुन्हा घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र त्या वेळी कारचा चालक कुठे आहे याचा काहीच पत्ता लागला नव्हता.

या घटनेनंतर टिटवाळा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. कारची माहिती, तिचा मार्ग आणि शेवटचा प्रवासी कोण होता याचा शोध घेण्यात आला. या तपासात ठाणे गुन्हे शाखेची टीमही सहभागी झाली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गीते आणि पोलिस अधिकारी भाऊसाहेब गायकवाड त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास हाती घेतला. उबेर कंपनीकडून गाडीची माहिती मिळवून तिचा संपूर्ण प्रवासाचा तपशील पोलिसांनी तपासला.

तपासादरम्यान पोलिसांना समजले की आदर्श भालेराव नावाच्या तरुणाने ही कार पुण्याला जाण्यासाठी बुक केली होती. आदर्श हा अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकणारा विद्यार्थी आहे. तो त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पुण्याकडे निघाला होता. त्यासाठी त्याने उबेर अ‍ॅपवरून कार बुक केली. चालक म्हणून नासीर अन्सारी नावाचा व्यक्ती गाडी घेऊन आला आणि त्याने आदर्शला घेऊन पुण्याकडे प्रवास सुरू केला.

प्रवास सुरू असताना गाडी गणेश खिंड परिसरात पोहोचली. त्या वेळी अचानक चालक नासीरने गाडी थांबवली. त्याने चाकू दाखवत आदर्शकडे पैशांची मागणी केली. तुझ्याकडे जे पैसे आहेत ते शांतपणे दे, असे तो म्हणाला. मात्र अचानक झालेल्या या प्रकारामुळे आदर्श घाबरला आणि त्याने विरोध केला. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार झटापट झाली.

या झटापटीदरम्यान नासीरच्या हातातील चाकू आदर्शच्या हातात गेला. धक्काबुक्कीमध्ये तो चाकू नासीरच्या गळ्याला लागला आणि त्याचा गळा गंभीर जखमी झाला. रक्तस्त्राव जास्त झाल्याने नासीरचा जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे आदर्शही घाबरून गेला.

घडलेली घटना पाहून आदर्शने नासीरचा मृतदेह तिथेच सोडून दिला. त्यानंतर त्याने उबेरची कार घेऊन टिटवाळ्याकडे गाडी चालवत आणली. गोवेली रस्त्यावर गाडी सोडून तो तिथून फरार झाला.

पोलिस तपासात पुढे असेही समोर आले की नासीर अन्सारीला पैशांची मोठी गरज होती. त्याने यापूर्वीही काही लोकांकडे पैसे मागितल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, पोलिसांनी आदर्शला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सविस्तर चौकशी सुरू आहे. या प्रकरणी ओतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT