Kedar Dighe  Sarkarnama
मुंबई

Kedar Dighe News : ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट; केदार दिघेंनी विचारला जाब, म्हणाले...

Pankaj Rodekar

Thane Political News : ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना इतर गोष्टींवर वारेमाप खर्च सुरू आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी करताना, काेरोना काळातही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारकडून एकाही कर्मचाऱ्याचा पगार थांबला नाही, पण या खोके सरकारने अशी कोणती परिस्थिती आणून ठेवली की कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे नाहीत.

यामुळे ठाणे महापालिका फक्त ठेकेदारांचे खिसे भरत तर नाही ना, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. प्रशासन चालवत असताना आर्थिक नियोजनावर लक्ष देता की, दुसऱ्यांच्या तिजोरी भरल्यामुळे पालिकेत खडखडाट आहे, असा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) सरकारवर निशाणा साधला आहे. याचदरम्यान सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत आयुक्तांनी राजीनामा द्यावा किंवा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही या वेळी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आर्थिक वर्ष संपत आले असताना पालिकेच्या तिजोरीत खडखडाट होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठीदेखील निधी शिल्लक नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे महसुली कामांना ब्रेक लावून तो निधी कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी वर्ग करण्यात आला आहे.

परंतु त्यामुळे दैनंदिन कामांना त्याचा फटका बसणार आहे. याशिवाय ठेकेदारांची बिले देण्यासाठीदेखील पालिकेकडे सध्या निधी नाही. छोट्या ठेकेदारांची बिले थांबविली जात असून, मोठ्या ठेकेदारांची बिले केवळ एका फोनवर काढली जात असल्याचेही माहितीदेखील पुढे आली आहे. त्यामुळे यासाठी निधी येतो कुठून, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

आता याच मुद्द्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे(Uddhav Balasaheb Thackeray) शिवसेना आक्रमक झाली असून, त्यांनी पालिका प्रशासनाला खडेबोल सुनावले आहेत. प्रशासन चालवत असताना आर्थिक नियोजनावर लक्ष देता की, दुसऱ्यांच्या तिजोरी भरल्यामुळे पालिकेत खडखडाट आहे, असा सवाल दिघे यांनी उपस्थित केला आहे.

दिघे यांनी हे पैशाचं पाणी नेमकं कुठं मुरतंय, हे पब्लिक सब जानती हैं. घोडा मैदान दूर नही, जनता तुमचा हिशेब लावणार असल्याचा दावाही केला. याशिवाय शनिवारी ठाण्याच्या लोकमान्यनगर येथे अतिक्रमण विभागाच्या कारवाईवेळी एका ६५ वर्षीय सर्वसामान्य व्यक्तीचा जीव गेला, याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला आहे.

तसेच दिघे यांनी शहरात अनधिकृत बांधकामे सुरू असताना प्रशासन आणि अधिकारी झोपलेले असतात का? की लाचेमुळे दुर्लक्ष करतात हे त्यांनी स्पष्ट करावे किंवा आयुक्तांनी राजीनामा द्यावा किंवा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT