Kiran Gosavi and Aryan Khan
Kiran Gosavi and Aryan Khan File Photo
मुंबई

महाराष्ट्रात वाँटेड असलेल्या गोसावीचा उत्तर प्रदेश पोलिसांनाही गुंगारा! नेमक काय घडलं...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला (Aryan Khan) अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या (NCB) कार्यालयात घेऊन जाणारा व त्याच्यासमवेत सेल्फी घेणाऱ्या किरण गोसावी (Kiran Gosavi) याच्या मागावर पुणे पोलिसांची पथके आहेत. त्यांना गुंगारा देणारा गोसावीने माध्यमांसमोर प्रकट होत आजच उत्तर प्रदेश पोलिसांपुढे शरण येणार असल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात त्याने उत्तर प्रदेश पोलिसांनाही गुंगारा दिला आहे. याचवेळी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, त्यात उत्तर प्रदेश पोलिसांनीच त्याला यासाठी नकार दिल्याचे समोर येत आहे. यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे.

गोसावी याने शरण येण्याचा प्रयत्न केला नसल्याचा दावा लखनौ पोलिसांनी केला आहे. गोसावीचा या संदर्भात आम्हाला कॉल आलेला नाही. याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही, असे लखनौ पोलिसांनी म्हटले आहे. याचवेळी गोसावीच्या निकटवर्तीयांनी एक ऑडिओ क्लिप जाहीर केली आहे. त्यानुसार, गोसावी हा लखनौमधील एक पोलीस ठाण्यात शरण येण्याची विनंती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना करीत आहे. परंतु, त्यासाठी पोलीस नकार देत आहेत. तुम्ही येथे शरण येऊ शकत नाही. तुम्ही दुसरीकडे जाऊन शरण या.

आर्यन खान यास एनसीबीच्या पथकाने काही दिवसांपुर्वी मुंबईत एका क्रूझवरुन ताब्यात घेतले होते. या प्रकरणामध्ये पंच म्हणून काम पाहिलेल्या किरण गोसावी याने आर्यनला एनसीबीच्या कार्यालयात आणले होते. त्यानंतर त्याच्यासमवेत काढलेला सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी या प्रकरणावर व एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मलिक यांनीच आर्यनसोबत सेल्फी घेणाऱ्या गोसावीचे बिंग फोडले.

त्यानंतर गोसावी हा फरासखाना पोलिस ठाण्यात दाखल एका फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर पुणे पोलिसांनीही गोसावीचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, 25 ऑक्टोबरला सायंकाळी गोसावीने प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून आपण उत्तर प्रदेश पोलिसांपुढे शरण येणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, त्याने अखेर उत्तर प्रदेश पोलिसांनाही गुंगारा दिला आहे.

दरम्यान, साईलने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यनला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती, असा दावाही साईलने केला आहे. वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचेही साईल यांनी सांगितले होते. आपल्या जीवाला धोका असल्याने एवढे दिवस आपण गप्प होतो, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT