Palghar Politics : आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत पालघर जिल्ह्यातील राजकारणात मोठा बदल झाला आहे. एकमेकांच्या विरोधात लढणारी महाविकास आघाडी आणि हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी एकत्र आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकी बविआ आणि मविआ एकत्र लढणार आहे.
यापूर्वी पालघर जिल्ह्यात एकत्रित शिवसेना, भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांची आघाडी सत्तेवर होती. शिवसेच्या फुटीनंतर लोकसभा आणि विधानसभेत महायुतीने सहापैकी ५ जागा जिंकल्याने येथील समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे येणाऱ्या जिल्हापरिषद निवडणुकीत महाविकास आणि बहुजन विकास आघाडी विरोधात महायुती असा सामना रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकी संदर्भात महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांची नुकतीच मनोर येथे बैठक झालीय. या बैठकीला बाविआ माजी खासदार बळीराम जाधव, सीपीएम आमदार विनोद निकोले, विक्रमगडचे माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते उत्तम पिंपळे, मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष विशाल जाधव उपस्थित होते.
या बैठकीत येणारी जिल्हा परिषद, महानगरपालिका ,नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठीची बोलणी करण्यात आली. या बैठकीत महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी एकत्रित निवडणूक लढविण्यावर एकमत झाले. त्यानुसार जिल्ह्यातील पंचायत समित्या, नगरपरिषद,नगरपंचायत निवडणुका एकत्रित लढण्यावर एकमत झाले आहे. तर वसई विरार महानगरपालिका निवडणुकी बाबतचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यात भाजपचा खासदार आहे. त्याच बरोबर ६ पैकी ३ जागेवर भाजपचे आमदार निवडून आले आहेत २ जागेवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार विजयी झाले आहेत. आणि डहाणूच्या जागेवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक आमदार निवडून आला आहे.
जिल्ह्यात सध्या सर्वाधिक शक्तिशाली पक्ष भाजप आहे. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बहुजन विकास आघाडीचा मोठा मतदार देखील येथे आहे. लोकसभेला आणि विधानसभेला महाविकास आघाडीला यश मिळाले नसले तरी बहुजन विकास आघाडीची ताकद स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत मिळाल्याने जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे,
बैठकीत बोलताना माजी खासदार बळीराम जाधव म्हणाले, भाजपच्या विरोधात एकत्र येणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आम्ही सर्व एकत्र आलो आहोत . आता निवडणुकीला ही एकत्रिपणे सामोरे जाणार आहोत. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसार यांनी सांगितले की, महाविकास आघाडी बरोबर असलेल्या सर्व संघटना बविआ, मनसे,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.
काँग्रेसचे वसई ग्रामीणचे अध्यक्ष राम पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या, विनाशकारी प्रकल्प आणून पालघर जिल्हा गुजरातला आंदण देणाऱ्या, जातीयवादी भाजपच्या पराभवासाठी महाविकास आघाडीची मोट पालघर जिल्ह्यात बांधणे गरजेचे आहे. याकरिता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, बहुजन विकास आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, सीपीएम, मनसे, आणि समविचारी संघटना एकत्र येत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.