Anand Paranjape and CM Shinde News Sarkarnama
मुंबई

Thane News : तुम्ही महायुतीचा धर्म तोडणार, मग आम्ही का पाळावा? शिवतारेंच्या मुद्द्यावरून परांजपेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा...

Chetan Zadpe

Thane Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय ठाम असल्याचे सांगितले आहे. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच आव्हान दिले आहे.

यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला होता. महायुतीचा धर्म तोडून बारामतीत शिवसेनेकडून काही दगाफटका होत असेल तर त्याची किंमत शिवसेनेला कल्याणमध्ये चुकवावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला होता, आता त्यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

आनंद परांजपे म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांची समजूत काढूनदेखील सातत्याने बारामती लोकसभेमध्ये फिरून ते महायुतीचे वातावरण खराब करण्याचे काम करत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेनेचे मुख्य नेते आहेत, त्यांचे आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही, असे चित्र दिसत आहे. त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांचे ऐकत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी शिवतारेंच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना घेरले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"शिवतारे बारामतीत महायुतीचा भाग असूनही महायुतीचा धर्म तोडत राहिले, तर महायुतीमध्ये शिवसेनादेखील ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहेत, तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारीदेखील तोडू शकतात. आम्हाला महायुतीचे वातावरण खराब होईल, असे कृत्य करायचे नाही. सातत्याने विजय शिवतारे महायुतीत विपरीत कृत्य करत आहेत," असेही परांजपे म्हणाले.

"संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा दरारा असताना, त्यांच्या पक्षातील नेतेच त्यांचे ऐकत नाहीत, हा चुकीचा संदेश लोकांमध्ये जात आहे. आम्ही 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून पाळत आहोत. शिवसेनेकडून (Shiv Sena) राष्ट्रवादीचे शक्तिस्थळ, राष्ट्रवादीच्या स्वाभिमानाला आव्हान देत, बारामतीमध्ये महायुतीचं वातावरण खराब करण्याचं काम ते करत आहेत," असेही परांजपे म्हणाले.

"शिवतारे हे महायुतीच्या दुधात मिठाचा खडा टाकत आहेत. पुरंदरच्या जनतेने त्यांना त्यांची जागा 2019 ला दाखवली होती. या वेळी नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याकरिता महाराष्ट्रातील नेत्यांची जबाबदारी आहे. आपल्याला महाराष्ट्रात 45 प्लस खासदार आणायचे आहेत.

मात्र, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या नेत्यांना नियंत्रणात ठेवत नाहीत हा संदेश लोकांमध्ये जात आहे, त्यांनी त्यांच्या नेत्यांना आवरावे आता खूप झालं," असा इशाराही परांजपे यांनी दिला आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT