Lok Sabha Election  Sarkarnama
मुंबई

6 Mumbai seats to vote on May 20: मुंबई कुणाची? भाजपला चितपट करण्यासाठी काँग्रेसने ठाकरे सेनेसोबत आखला डाव

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News :दहा वर्षांपूर्वी मुंबईतील सहापैकी सहा खासदार (6 Mumbai seats to vote on May 20) असणाऱ्या काँग्रेसने या निवडणुकीत केवळ दोनच जागेवर उमेदवार मैदानात उतरवले आहेत. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या मुंबईत दोन्ही शिवसेना आपल्या मित्रपक्षासोबत चुरशीची लढत देत आहे. मुंबई पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मदत घेतली आहे. ठाकरे सेनेच्या (Uddhav Thackeray) माध्यमातून भाजला चितपट करण्यासाठी काँग्रेसने डाव आखला आहे.

मुंबईमधील सहापैकी सहा जागांवर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार (North Mumbai Lok Sabha 2024) निवडून आले होते. २०१४च्या निवडणुकीत काँग्रेसचा गड ढासळला. उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांच्या जीवावर भाजपने काँग्रेसला जेरीस आणून 'मुंबई आमचीच' म्हणत, मुंबईवर ताब्यात घेतली. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीची फुटीनंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता मुंबईकर कुणाच्या पारड्याच मत टाकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

उत्तर मुंबई

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना भाजपने मैदानात उतरवले आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने भूमिपुत्र असलेल्या भूषण पाटील यांना तिकीट दिले आहे. राम नाईक हे पाच तर गोपाल शेट्टी हे दोन वेळा येथून खासदार झाले आहेत. काँग्रेसने सहा वेळा भाजपने सात वेळा तर हा मतदारसंघ जिंकला आहे. जनता पक्षाने १९७७ आणि १९८० अशा दोन वेळा विजय मिळवला होता, पैकी एकवेळा लमृणाल गोरे निवडून आल्या होत्या.

दक्षिण मध्य मुंबई

या मतदारसंघात दोन्ही शिवसेनेत लढत होत आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई यांची लढत शिंदे गटातील नेते, विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्यासोबत आहे. आठ वेळा शिवसेनेचे उमेदवार निवडणून आले आहेत, तर पाच वेळा काँग्रेसने आपला झेंडा फडकावला आहे. एकदा जनता पक्षाकडून बी. सी. कांबळे तर एकदा अपक्ष दत्ता सामंत यांनी विजय मिळवला होता. कम्युनिस्ट पक्षाकडून १९५७ आणि १९६७ मध्ये कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी विजय मिळवला होता.

दक्षिण मुंबई

या निवडणुकीत मतदार संघात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे अरविंद सावंत आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या यामिनी जाधव यांच्यात सामना होत आहे.आतापर्यंत दहा वेळा काँग्रेसने या मतदारसंघात विजय मिळवला आहे. काँग्रेसचे स. का. पाटील यांनी तीन वेळा, मुरली देवरा यांनी चार वेळा आणि मिलिंद देवरा यांनी दोन वेळा इथून निवडणूक जिंकली आहे. जयवंतीबेन मेहता यांनी भाजपकडून दोन वेळा, अरविंद सावंत यांनी शिवसेनेकडून दोन, जनता पक्षाने दोन तर संयुक्त समाजवादी पक्षाने एक वेळा विजय मिळवला आहे.

उत्तर मध्य मुंबई

काँग्रेसने आठ वेळा विजय मिळवला आहे. दोन वेळा भाजपच्या पूनम महाजन यांनी विजय मिळवला आहे, रिपाईंकडून रामदास आठवलेही एकदा याठिकाणाहून निवडून आले आहेत. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, अहिल्या रांगणेकर आणि रोझा देशपांडे यांनी कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणूक लढवून विजय मिळवला आहे. विद्याधर गोखले आणि नारायण आठवले या दोन पत्रकारांनी शिवसेनेच्या तिकीटावर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांच्याविरोधात भाजपने प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना मैदानात उतवलं आहे.

वायव्य मुंबई

उद्धव ठाकरे सेनेकडून अमोल गजानन कीर्तीकर आणि शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांच्यात लढत होत आहे. दोन्ही शिवसैनिकांमध्येच हा सामना होणार असल्याने शिवसैनिकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. गद्दार की निष्ठावान या मुद्या निवडणुकीत महत्वाचा ठरतो आहे. मधुकर सरपोतदार आणि गजानन कीर्तीकर यांनी शिवसेनेकडून प्रत्येकी दोन वेळा तर जनता पक्षाकडून राम जेठमलानी यांनी दोन वेळा निवडणूक जिंकली आहे. हा मतदारसंघ काँग्रेसने नऊ वेळा जिंकला आहे. अभिनेते सुनील दत्त पाच वेळा तर एकदा प्रिया दत्त यांनी विजय मिळवला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT