Nana Patole and Ajit Pawar Latest Marathi News
Nana Patole and Ajit Pawar Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

हास्यास्पद! खंजीर खुपसला म्हणणाऱ्या नानांना अजितदादांनी 'ती' आठवण करून दिली

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पाठीत खंजीर खुपसल्याचे वक्तव्य केलं आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोले यांचीच फिरकी घेतली. तसेच त्यांनी मारलेल्या बेडूकउड्यांचीही आठवण करून दिली. पटोलेंचे वक्तव्य हास्यास्पद असल्याचे सांगत पवारांनी ते कुठल्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले आहेत, याची आठवण करून दिली. (Ajit Pawar Latest Marathi News)

अजित पवार यांनी गुरूवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. पटोलेंच्या टीकेवर बोलताना पवार म्हणाले, पटोले हे आधी भाजपमध्ये होते. आता भाजपने म्हणायचे का, आमच्या पाठीत खंजीर खूपसून तिकडे गेले. आम्ही कधीही यांनी पाठीत खंजीर खुपसला आणि यांनी तलवार खुपसली असं कधी सांगत नाही. (NCP-Congress Latest Marathi News)

नाना पटोले आधी काँग्रेसमध्ये होते. नंतर भाजपमध्ये गेले, पुन्हा काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे 'झाकली मूठ सव्वा लाखाची' सगळ्यांनी ठेवावी. हे हेडलाईन मिळवण्यासाठी पाठीत खंजीर खुपसला वगैरे म्हणतात. संघटनेमध्ये प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकारी आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना काम करत आहे. मागेही राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र होते. परंतु, राज्य, राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेत असताना तेथील नेते निर्णय घेत असतात. जिल्हा पातळीवर वेगवेगळ्या राजकीय घटना घडत असतात, असं पवारांनी स्प्ष्ट केलं.

तिथली राजकीय, भौगोलिक वातावरण योग्य राहण्यासाठी सर्वच आघाडीतील राजकीय पक्षांमध्ये समन्वय असेल तर प्रश्न निर्माण होत नाहीत. मागील काळात काँग्रेसनेही तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी भाजपशी संधान बांधले आहे. मी त्याला फार महत्व देऊ इच्छित नाही, असं पवार म्हणाले.

जबाबदार नेत्यांनी वक्तव्य करत असताना आपल्या वक्तव्याचा वेडावाकडा अर्थ निघून वेडावाकडा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी, असा खोचक टोला पवारांनी पटोलेंना लगावला. आत्ताच्या घडीची परिस्थिती लक्षात घेता तिनही पक्ष एकत्र आले तरच 145 हा बहुमताचा आकडा पार करता येतो आणि सरकारमध्ये राहून जनतेची कामे करता येतात, याची आठवण पवारांनी करून दिली.

पटोले यांनीही राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी घेतले आहेत. आम्ही दोघांनी मिळून 1999 ते 2014 असे पंधरा वर्ष आघाडीचे सरकार चालवले. त्याहीवेळी काही जिल्ह्यात एकमेकांविरोधात उभे राहायचो. आता आघाडी एकजूट राहायला हवी. समंजसपणे भूमिका घ्यायला हवी, असे पवारांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT