Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Cabinet Meeting : राज्यातील 40 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Ganesh Thombare

Mumbai News: राज्यातील काही भागात कमी प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे राज्यातील ज्या तालुक्यांमधील मंडळांमध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणीने जोर धरली होती.

त्यामुळे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.

राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे, त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून या मंडळांकरिता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने निर्णय घ्यावा, असे निर्देशही या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देण्याच्या मदतीबाबत निर्णय घेण्यात येईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने पीक पाणी परिस्थितीच्या आढाव्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील परिस्थितीची माहिती दिली. यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधल्या तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेण्यात आले आहेत. राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या १३.४ टक्के घट आली असून, रब्बी पेरण्यादेखील संथपणे सुरू आहेत. आतापर्यंत १२ टक्के पेरण्या झालेल्या आहेत अशी माहिती या वेळी कृषी विभागाने दिली.

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना अशी मिळणार मदत

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टर मर्यादेत मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. जून ते ऑक्टोबर २०२३ या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाले.

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार दोन हेक्टर मर्यादेऐवजी आता तीन हेक्टर मर्यादेत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने मदत देण्यात येईल. त्याचप्रमाणे शेत जमिनीच्या नुकसानीसाठी दोन हेक्टर मर्यादेत मिळणारी केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणारी मदत आता अल्पभूधारक शेतकरी नसलेल्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने दोन हेक्टर मर्यादेत मिळेल, त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT