Devendra Fadnavis, Manoj Jarange Sarkarnama
मुंबई

Fadnavis On Jarange : मनोज जरांगे पाटलांनी तडीपार करण्यासारखं काय केलं? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या वाटेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडथळा निर्माण करतात, असा आरोप करत आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी अनेकदा फडणवीसांना लक्ष्य केले आहे. दरम्यान, आंदोलन काळात झालेल्या हिंसेंतून जरांगे पाटलांवर काही ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. लोकसभा निवडणुकीत मी खासदार मोहीम राबवून अनेक अर्ज दाखल करणार असल्याचा इशाराही जरांगेंनी (Manoj Jarange) सरकारला दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारचा मला तडीपार करण्याचा डाव असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. याला फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिले आहे. Fadnavis On Jarange

जरांगे पाटलांना तडीपारीच्या सरकारच्या भूमिकेवर पत्रकारांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) छेडले. यावर त्यांनी विरोधकांना लक्ष्य करत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, राज्यात आमचे खूप हितचिंतक आहेत. आता ते जरांगे पाटलांना खूप काही सांगत असतात. त्यानुसार जरांगेही बोलत असतात. आता जरांगे पाटलांना तडीपार करण्यासारखे काही काम केले आहे का? असे कुणी कोणाला तडीपार करते का? मात्र वाहत्या गंगेत अनेक लोक हात धुऊन घेत असून ते पाटलांना मिसगाईड करतात, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

आंदोलन काळात राज्यभर मराठा आंदोलकांवर (Maratha Reservation) अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. ते मागे घेण्यावर फडणवीसांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या केसेसमधील आंदोलनाचे गुन्हे मागे घेणार आहे. मात्र ज्या ठिकाणी जाळपोळ, तोडफोड आणि पोलिसांवर हल्ले झालेले आहेत, ज्यात कुणी दिसत आहेत, त्यांच्यावरील केसेस मागे घेणे शक्य नाही, असा इशाराही फडणवीसांनी दिला आहे.

राज्यातील 24 जिल्ह्यांत 492 केसेस आहेत. त्यातील दोन जिल्ह्यात सर्वात जास्त गुन्हे दाखल आहेत. त्यां गुन्ह्यांची छाननी सुरू झालेली आहे. त्यातील 172 केसेस मागे घेण्याबाबत शिफारसही झालेली आहे. मात्र सहा केसेस अशा आहेत त्यांची शिफारस पोलिसांनी नाकारलेली आहे. इतर केसेसबाबत छाननी सुरू आहे. आता आचारसंहिता लागलेली असून या काळात छाननी संपवू, असा शब्दही त्यांनी दिला.

केसेस मागे घेण्याची एक प्रक्रिया असते. त्यासाठी लोकांना बयानाला बोलवावे लागते. बयानाला नोटीस केली तरी नवीन केस झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विनाकारण संभ्रम पसरवण्याचा हा प्रयत्न विरोधकांकडून केला जा आहे. सगेसोयरे असतील, किंवा इतर गोष्टीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) घोषणा केलेली आहे. त्यांच्यापुढे कोणीही नाही. त्यावर कुणीही काहीही बोलतात. त्यामुळे या विषयावर जास्त काही बोलत नाही, असे म्हणत फडणवीसांनी निवडणूक झाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर पुन्हा प्रयत्न केले जाणार असल्याचे सूचित केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT