Maharashtra Political Crisis:
Maharashtra Political Crisis:  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : अजितदादांना सत्तेत सहभागी करण्यासाठी भाजपसाठी 'हे' ठरलं मोठं कारण..

Dattatrya Deshmukh

Deputy CM Ajit Pawar : राज्याच्या राजकीय वर्तुळात काल (रविवारी) मोठा राजकीय भूकंप झाला. यानिमित्ताने 2019 मध्ये सत्तास्थापनेच्या नाट्यावेळी घडलेल्या घडामोडींच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

संपूर्ण बहुमत असतानाही स्वपक्षातील आमदारांना मंत्रीपद देण्याऐवजी दोघात तिसरा का, असा साधारण प्रश्न नागरिकांना पडत आहे. मात्र, लोकसभेसाठी भाजपची अपरिहार्यता ही राष्ट्रवादी व विशेषत: अजित पवार व त्यांच्या समर्थकांसाठी संधी ठरली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून अजित पवार यांच्याबद्दल चर्चा सुरु होत्या. याच काळात आजारी सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास मिशन (एनसीडीसी) मार्फत राज्य शासनाच्या हमीने आर्थिक मदतीच्या यादीत राष्ट्रवादीच्या व अजित पवार यांच्या समर्थक नेत्यांच्या पाच कारखान्यांचा समावेश होता. त्यामुळे पवार समर्थकांसह सरकारमध्ये सहभागी होणार हे निश्चित मानले जात होते.

वर्षभरापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची तोडफोड करुन राज्यातले सत्तेचे गणित जुळविले. मात्र, सद्यपरिस्थितीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटत असलेली सहानुभूती, वज्रमुठ सभांचा प्रतिसाद व सत्तेतल्या शिवसेनेची व मुख्यमंत्र्यांची कमी होत असलेली क्रेझ भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. या समीकरणानुसार राज्यात लोकसभेचे गणित जुळणार नसल्याचे अहवाल भाजपमधीलच धुरीणांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यात नवे समीकरण जुळविण्याचे सुत्र केंद्रातील नेत्यांनी हाती घेतले होते. त्याची अंमलबजवणी अखेर रविवारी झाली.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रातून ४० पार आकडा हवा आहे. भाजपला शिवसेनेच्या साथीने हा आकडा गाठणे कठीण असल्याने बहुमत असतानाही राष्ट्रवादीला सत्तेत घ्यावे लागले. विशेष म्हणजे आतापर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या फैरी झाडल्या, गाडीभर पुरावे जमा केले,

ईडीच्या चौकशा व नोटीसा दिल्या त्याच पक्षाला भाजपला सोबत घ्यावे लागते यावरुन ही अपरिहार्यता सहज लक्षात येते. राष्ट्रवादी व विशेषत: अजित पवार आणि समर्थकांना मात्र ही दुहेरी संधी ठरली आहे. एकतर या फेऱ्यातून सुटका आणि मंत्रीपदाच्या खुर्च्याही मिळाल्या.

सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार आगामी लोकसभेला महाराष्ट्रात भाजपचे गणित जुळणे कठिण असल्याचे भाजपला स्पष्ट जाणवत असल्यानेच राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रीपदाच्या खुर्च्या भेटल्या आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेच्या भितीपोटी भाजपची साथ देणं ही राष्ट्रवादीचीही अपरिहार्यताच होती हेही नाकारुन चालणार नाही.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT