Thackeray Group news Sarkarnama
मुंबई

Thackeray Group:'स्टायपेंडची भीक नको; हक्काच्या नोकऱ्या द्या; कर्नाटकात झाले ते महाराष्ट्रात घडेल का?

Mangesh Mahale

विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने योजनांचा पाऊस पाडला आहे. सरकारने 'लाडका भाऊ'योजना जाहीर केली आहे. या योजनेवरुन शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र 'सामना'मधून टीकास्त्र डागले आहे. 'स्टायपेंडची भीक नको; हक्काच्या नोकऱ्या हव्यात,'असा हल्लाबोल अग्रलेखातून केला आहे.

देशात नोकऱ्या देणारा प्रदेश होता.आज महाराष्ट्राची अवस्था दिल्लीच्या वाटेवरील पायपुसण्यासारखी झाली आहे. महाराष्ट्रातील सर्व मोठे उद्योग, आर्थिक संस्था, नोकऱ्या गुजरातकडे वळवल्या व मिंधे सरकार बारावी पास व पदवीधरांना पाच-दहा हजारांचा मासिक भत्ता देऊन त्यांची तोंडे गप्प करीत आहे.

पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्रातील प्रत्येक चांगली गोष्ट गुजरातला पळवत आहेत. अशी पळवापळवी त्यांनी दक्षिणेतील राज्यांच्या बाबतीत करून दाखवावी, म्हणजे प्रांतीय स्वाभिमानाचे पाणी काय असते ते त्यांना दिसेल, असा इशारा अग्रलेखातून दिला आहे.

मुंबई महाराष्ट्राची राजधानी, पण मुंबईतील नोकऱ्यांवर वर्चस्व दाक्षिणात्यांचे होते. मराठी तरुण हा घरचा मालक असूनही तो कायम प्रतीक्षेत पायरीवरच उभा दिसायचा, पण शिवसेनेच्या स्थापनेनंतर हे चित्र साफ बदलले. मराठी माणसाला नोकऱ्यांच्या सर्वच क्षेत्रांत हमखास प्राधान्य मिळू लागले. तरीही मुंबई-महाराष्ट्रावर आदळणारे परप्रांतीयांचे लोंढे काही थांबले नाहीत, असे वास्तव अग्रलेखात मांडले आहे.

कर्नाटक सरकारवर अग्रलेखातून निशाणा साधला आहे. कर्नाटकातील सर्व खासगी उद्योगांत 50 ते 70 टक्के जागा फक्त कन्नडिगांसाठी राखीव ठेवण्याचे विधेयक मंजूर झाले. आपापल्या राज्यात स्थानिकांना म्हणजेच भूमिपुत्रांना नोकरीधंद्यात किमान 80 टक्के प्राधान्य मिळायलाच हवे.

हे आंदोलन पन्नास वर्षांपूर्वी शिवसेनेने मुंबईत सुरू केले तेव्हा शिवसेनेच्या या भूमिकेस कडाडून विरोध करणारी दक्षिणेचीच राज्ये होती. देश एक आहे आणि अशा निर्णयामुळे राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येईल, हा तर चक्क प्रांतीयवाद आहे, अशी डबडी तेव्हा याच लोकांनी वाजवली होती, याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.

कर्नाटकाने खासगी क्षेत्रात त्यांच्या कन्नड पोरांसाठी आरक्षण ठेवले होते. कारण रोजगार हा आता ज्वलंत विषय बनला आहे. बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, गुजरातसारख्या राज्यांतील लोंढे पोटापाण्यासाठी मुंबई, बंगळुरू, कोलकाता, हैदराबादसारख्या शहरांवर आदळत आहेत. त्यामुळे या शहरांचा भूगोल व अर्थशास्त्र्ा, जीवशास्त्र्ा अत्यवस्थ होऊन कोलमडले आहे, असे अग्रलेखात नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT