Vasai Virar Municipal Corporation
Vasai Virar Municipal Corporation 
मुंबई

वसई-विरार महापालिकेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने धाडली नोटीस

सरकारनामा ब्युरो

विरार : पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यात वसई-विरार महापालिकेला (Vasai Virar Municipal Corporation) अपयशी ठरल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) पालिकेला नोटीस बजावली आहे. महापालिकेला बजावण्यात आलेल्या या दंडाची रक्कम तब्बल 113.58 कोटी रुपये इतकी आहे. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला ही नोटीस बजावली आहे. तसेच, नुकसान भरपाईची ही रक्कम सात दिवसांत न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही मंडळाने पालिकेला दिला आहे.

घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि वायुप्रदूषण नियंत्रित करण्यात वसई-विरार महापालिका अपयशी ठरल्याने राष्ट्रीय हरित लवादाने वसई-विरार महापालिकेला प्रतिदिन 10 लाख 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. या दंडाची सक्तीने वसुली करण्यात यावी, असे निर्देश समितीने आपल्या अहवालात दिले होते.

पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यात वसई-विरार महापालिकेला अपयश आल्याने पर्यावरण अभ्यासक चरण भट यांनी हरित लवादाकडे जनहित याचिका केली होती. या याचिकेच्या माध्यमातून भट यांनी, सांडपाण्यावर प्रक्रिया न करता हे पाणी थेट समुद्रात सोडण्यात येत असल्याने अरबी समुद्र, वसई व वैतरणा खाडी प्रदूषित होत असल्याचे हरित लवादाच्या निदर्शनास आणून दिले होते.

या विषयातील गांभीर्य लक्षात घेऊन हरित लवादाने त्रीसदस्यीय समिती गठित करून पाहणी करण्याचे आदेश दिले होते. या समितीत जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी राजेंद्र राजपूत आणि वैज्ञानिक विभागाचे ई विभागीय अधिकारी प्रतीक भरणे यांचा समावेश होता.या समितीने शहरातील सात ठिकाणांची पाहणी करून पाण्याचे नमुने घेतले होते. या नमुन्यांची प्रयोगशाळेत चाचणी केली असता, समुद्र व खाडीचे पाणी प्रदूषित होत असल्याचे निदर्शनास आले होते. समितीने तशी नोंद आपल्या अहवालात केली होती.

विशेष म्हणजे या समितीने गोखिवरे घनकचरा प्रकल्पाचीही पाहणी केली होती. या पाहणीत या समितीने क्षेपणभूमीवर अंदाजे 1 लाख 20 हजार टन कचरा जमा असून परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याचेही म्हटले होते. नियमाप्रमाणे कचरा विलगीकरण करण्यात येत नसल्याचे निरीक्षणही नोंदवले होते. पालिकेकडे प्रकल्प विलगीकरण यंत्र असली तरी पाहणी वेळी ही यंत्र कार्यरत नसल्याचेही समितीच्या निदर्शनास आले होते.

परिणामी राष्ट्रीय हरित लवादाने वसई-विरार महापालिकेला ठोठावलेल्या दंडाची सक्तीने वसुली करण्यात यावी, असे निर्देश समितीने आपल्या अहवालात दिले होते. या दंडवसुलीबाबत आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला 28 जानेवारी रोजी नोटीस बजावली आहे. पालिकेला बजावण्यात आलेल्या या दंडाची रक्कम आता तब्बल 113.58 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया होत न नसल्याने प्रतिदिन साडेदहा लाख रुपयेे; तर घनकचरा व्यवस्थापन होत नसल्याने दर महिना 10 लाख रुपये दंड हरित लवादाने पालिकेला दंड ठोठावलेला आहे.

आयुक्त म्हणून मी आताच पदभार स्वीकारला आहे .याबाबतची अधिकृत माहिती घेतो तसेच कायदे विषयी तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT