Manoj Jarange Patil Sarkarnama
मुंबई

Manoj Jarange Patil Maratha Reservation : मुख्यमंत्री शिंदेंची चाल यशस्वी, जरांगे पाटलांचा मराठा मोर्चा शांत?

सरकारनामा ब्यूरो

संजय परब

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा मुंबईच्या दिशेने कूच करत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चाल यशस्वी ठरली आहे. आधी आपल्या अधिकाऱ्यांना शासन निर्णय (जीआर) घेऊन पाठवत मोर्चाला शांत करणारे शिंदे आता आपली पुढची खेळी करताना स्वतः मोर्चाला सामोरे जात सुधारित जीआर जरांगे यांच्या हाती देतील आणि यानंतर आंदोलन स्थगित झाल्याचे घोषित करण्यात येईल, असे जवळपास निश्चित झाले आहे. मोर्चा शांत होणार की पुन्हा मुंबईकडे घोंघावणार, याकडे लक्ष आहे. (Manoj Jarange Patil )

जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल झाले आहे. आधी ठरल्याप्रमाणे नवी मुंबईत सभा घेतल्यानंतर ते मुंबईत दाखल होणार होते. मात्र, आता यामधून मार्ग निघाला आहे. यासाठी जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार 'जीआर' तयार झाला आहे.

नवी मुंबईतील 'एपीएमसी मार्केटच्या मुख्य कार्यालयात जरांगे पाटील यांच्याशी चर्चा होणार आहे. सरकारने तयार केलेला नवीन जीआर आणि राजपत्राचा मसुदा जरांगे पाटील यांना दाखवण्यात येईल. त्यानंतर जरांगे वकिलांसोबत बैठक घेणार आहे. गरज भासल्यास त्यात बदल सूचवणार आहेत. अन्यथा हा जीआर निघणार नाही. मात्र, जरांगे यांना मसुदा मान्य झाल्यास स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे यांना जीआर देतील. यामुळे शुक्रवारी मराठा मोर्चा ( Maratha Protest ) स्थगित होईल.

जरांगे पाटील २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघाले. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात दाखल होताच सरकारकडून हालचाली वेगाने सुरु झाल्या. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मनोज जरांगे ( Manoj Jarange Patil ) यांना भेटले. त्यानंतरही जरांगे यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर जरांगे पाटील पुणे जिल्ह्यात दाखल होताच पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. परंतु ती चर्चा यशस्वी झाली नाही. त्यामुळे जरांगे नवी मुंबईत दाखल झाले.

आज मराठा आरक्षणावर अंतिम तोडगा काढण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांनी आपला दैनंदिन उपक्रम सुरु ठेवला आहे. आता नवी मुंबईत वाशीच्या शिवाजी चौकामध्ये मनोज जरांगे सभा घेणार आहेत. या सभेसाठी असंख्य मराठा बांधव शिवाजी चौकात जमण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत दाखल होण्यापूर्वी जरांगे पाटील यांची ही अखेरीची सभा असणार आहे. आता मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही? अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मात्र शिंदे यांची शिष्टाई कामाला आल्याने मोर्चा नवी मुंबईतच स्थगित होईल.

Edited By : Rashmi Mane

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT