Manoj Jarange Mumbai protest latest news : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने चर्चेची दारे बंद करण्याची भूमिका घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारने चर्चेऐवजी मुद्द्यांवर बोलावे. सरकार ऐकणार नसेल तर मराठा समाज मुंबईत येऊन आंदोलन करेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. येत्या १२ तारखेला चर्चेनंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला संपवण्याचीच सरकारची भूमिका असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. सरकारचा नाकर्तेपणा सिद्ध झाला असून ते सपशेल अपयशी ठरले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांनी ठरवून मराठा समाजाची प्रमाणपत्रे रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला.
आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण स्थगित करण्याचा प्रश्नच नसल्याचे जरांगे यांनी सांगितले. “उपोषण स्थगित करून पोळ्याला जायचे आहे का?” असा सवाल करत त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. सरकार ज्या पद्धतीने मराठा समाजाशी वागेल, त्याच पद्धतीने समाजही सरकारसोबत वर्तन करेल, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर सरकारकडूनही प्रतिक्रिया आली आहे. “काहीही केले तरी मनोज जरांगे पाटील यांचे समाधान होत नाही,” असे म्हणत मंत्री विखे पाटील यांनी आता सरकारचे शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करणार नसल्याची भूमिका मांडली. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील अधिक आक्रमक झाले आहेत.
मराठा समाजाचे नुकसान होत असताना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे केवळ पाहत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. फडणवीस आरक्षण देऊ शकत नाहीत, हे सरकारने मान्य करावे, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनादरम्यान आंदोलकांना झालेल्या त्रासाची किंमत सरकारला नसल्याचेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्वी आपला जीव होता; मात्र त्यांनी मराठा तरुणांच्या भवितव्याशी खेळ केल्याचा आरोप जरांगे यांनी केला. संजय शिरसाट यांच्याकडून मराठा समाजाची प्रमाणपत्रे रद्द करून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. शिंदे यांच्या समर्थकांकडून आपल्यावर टीका केली जात असताना प्रमाणपत्रे रद्द करण्याच्या मुद्द्यावर मात्र ते काहीच बोलत नसल्याचे जरांगे यांनी म्हटले.
आपल्या नेत्यासाठी मराठा समाजावर टीका करू नका, असे आवाहन करत जरांगे यांनी शिंदे समर्थक आमदारांवरही पलटवार केला. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न थांबवावा, अन्यथा त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
आपली भाषा बदलण्याचा सल्ला दिला जात असला तरी आपण भाषा बदलणार नाही, उलट यापेक्षा अधिक तीव्र भूमिका घेऊ, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. सरकारसोबत चर्चेनंतर १२ तारखेला पुढील निर्णय घेतला जाईल आणि गरज पडल्यास मराठा समाज मुंबईत येऊन आंदोलन करेल, अशी घोषणा त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.