Manoj Jarange Patil Sarkarnama
मुंबई

Manoj Jarange On Viral Video : मराठा समाजाची दिशाभूल करणे खूप महागात पडेल; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : राज्यात मराठा आरक्षणावरून रान पेटले असताना एका व्हिडिओमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गंभीर नसल्याची टीका होऊ लागली आहे. मराठा आरक्षणासाठी सोमवारी सर्वपक्षीय बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलण्यापूर्वीचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस, पवारांचा संवाद व्हायरल होत आहे. यावरून आरक्षणासाठी १५ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी 'समाजाची दिशाभूल कराल तर महागात पडेल,' असा इशारा दिला आहे. (Latest Political News)

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखाली सोमवारी सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत काय झाले, याची माहिती देण्यासाठी शिंदे, फडणवीस, पवार एकाच वेळी प्रसारमाध्यमांसमोर आले. या वेळी बसण्यापूर्वीच "आपण फक्त बोलून मोकळे व्हायचे आणि निघून जायचे," असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. याला दुजोरा देत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हसून मान हलवली, तर उपमुख्यमंत्री पवार यांनी "हो... येस.." असे उत्तर दिले. बसल्यानंतर अजित पवारांना माईक सुरू असल्याचे लक्षात आले. यावर "हे एकू जाते," असे म्हणत पवारांनी शिंदेंना सावध केले. (Maharashtra Political News)

काही सेकंदांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे विरोधकांच्या हातात सरकारची कोंडी करण्याचे आयतेच कोलीत मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर मराठा आरक्षणासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगेंनी सबुरीने प्रतिक्रिया देत समाजाची दिशाभूल न करण्याचे आवाहन केले आहे. तसे काही झाले तर सरकारला महागात पडेल, असाही इशारा त्यांनी दिला आहे.

जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले, "मागणीनुसार आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी सरकारला आम्ही एक महिन्याचा वेळ दिला आहे. या महिन्यात त्यांना काय, तो निर्णय घ्यायचा आहे. आरक्षणाबाबत त्यांनी वक्तव्य केले असेल, तर समाज त्यांना उत्तर देईल. मात्र, मी आंदोलनकर्ता म्हणून त्यांना पुन्हा विनंती करतो की समाजाला वेठीस धरू नये."

दरम्यान, संबंधित वक्तवे आरक्षणाबाबत केली आहेत का, याचीही जरांगे यांनी खात्री करून घेतली. सर्वपक्षीय बैठकीनंतरची विधाने असल्याचे समजल्यानंतर ते म्हणाले, "इच्छा नसतानाही मराठा समाजाने आरक्षणावर योग्य निर्णय घेण्यासाठी सरकारला महिन्याचा वेळ दिला आहे. मराठा समाज त्या दिवसाची वाट पाहत आहे. या काळात त्यांनी बोलून मोकळे व्हायचे की काय, हे त्यांनी ठरवावे. महिन्याचा वेळ दिल्यानंतरही त्यांनी समाजाला वेठीस धरू नये. तसेच विनाकारण तिघांनीही काहीही वक्तव्ये करू नयेत. हे सत्य असेल तर समाजाची दिशाभूल करणे खूप महागात पडेल," असा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT