Eknath Shinde, Tushar Doshi, Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation : तुषार दोशींची तीन दिवसांत दुसऱ्यांदा बदली, केसरकरांच्या विरोधानंतर गृहविभागाचं एक पाऊल मागे

Sachin Fulpagare

Maratha Reservation Protest in Maharashtra : जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीमार झाल्यानंतर बदली करण्यात आलेल्या तुषार दोशींची पुन्हा बदली झाली आहे. दोशींच्या बढती आणि बदलीवरून मराठा आंदोलनासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला होता, तसेच शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी बदलीला विरोध केला होता. या विरोधानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहविभागाने एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा आहे, पण तुषार दोशींच्या बदलीला स्थगिती न देता त्यांची दुसऱ्या पदावर बदली झाल्याने त्यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जालना पोलिस अधीक्षकपदावरून बदली करत तुषार दोशी यांना पुणे गुन्हे शाखेची (सीआयडी) जबाबदारी सोपवण्यात आली होती. तुषार दोशी यांना क्रिम पोस्ट दिल्याचा दावा करत त्यांच्या बदलीवरून विरोधकांनी टीका केली होती. आता तुषार दोशी यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांची पुन्हा बदली झाली आहे. तुषार दोशींची तीन दिवसांत दुसऱ्यांदा बदली झाली आहे. तुषार दोशी यांच्याकडे आता पुणे लोहमार्ग पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

काय म्हणाले होते दीपक केसरकर?

शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं होतं. चौकशी होईपर्यंत तुषार दोशी यांची बदली करू नये, अशी मागणी केसरकर यांनी केली होती. "मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुषार दोशींच्या बदलीविरोधात पत्र लिहिलं होतं. मराठा आरणक्षाचा प्रश्न हा लाठीमार झाल्यामुळे चिघळला. आणि ते प्रकरण शांत होण्यापूर्वीच त्यांची बदली करणं हे आगीत तेल ओतण्यासारखं आहे. अशा प्रकरणात चौकशी पूर्ण झाल्यानंतर बदली करण्यात येते. तोपर्यंत त्या अधिकाऱ्याला पोलिस मुख्यालयात ठेवता येतं. यात काही अडचण नसते. मी स्वतः चार वर्षे गृह खात्यात काम केलेलं आहे. वातावरण शांत होणं हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने मी हे पत्र दिलं होतं", असे मंत्री दीपक केसरकर म्हणाले होते.

"अंतरवाली सराटीतील लाठीमार प्रकरणी चौकशी होईपर्यंत दोशींच्या बदलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. ही वस्तुस्थिती आहे. मी माझी बाजू मुख्यमंत्र्यांकडे मांडली. चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्याची बदली केल्यास चुकीचं वाटेल. अशा निर्णयाने मराठा समाजात चुकीचा संदेश जाऊन नाराजीची भावना निर्माण होऊ शकते", असे मंत्री दीपक केसरकर म्हणाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुती सरकारमध्ये नेमकं काय चाललंय? वडेट्टीवार यांचा सवाल

तुषार दोशींच्या बदलीवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकार टीका केली होती. राज्य सरकारमध्ये एकमत नाही. लाठीमारानंतर जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर कठोर कारवाईची अपेक्षा होती. मात्र, कारवाईच्या नावाखाली त्यांना पुण्यात 'क्रिम पोस्ट'वर बदली मिळाली, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर ट्विट करून केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT