_Aaditya Thackeray And Sanjay Raut.jpg Sarkarnama
मुंबई

Marathi Classical Language Status : केंद्राकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, ठाकरे अन् राऊत नेमकं काय म्हणाले..?

Deepak Kulkarni

Mumbai News : केंद्रातील मोदी सरकारनं आपल्या धडाकेबाज निर्णयांचा धडाका कायम ठेवला आहे. अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला मोठं यश आलं असून आता केंद्र सरकारनं संपूर्ण महाराष्ट्राला सुखावणारा निर्णय घेतला आहे. यामुळे खूप वर्षांपासूनची मराठी माणसाची मागणी पूर्ण झाली आहे.

केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीसह पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात दर्जा मिळाला आहे. या निर्णयाचं सर्वच स्तरांतून स्वागत होत असतानाच आता या निर्णयामुळे राजकीय श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

केंद्र सरकारची मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी(ता.3)पार पडली.या बैठकीनंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. या निर्णयाचं महायुती, मनसे या पक्षांसह अनेक मान्यवरांनी स्वागत केलं आहे.तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र, या निर्णयावरुन केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा जुमला करण्यात आल्याची टीका केली आहे. तसेच माजी मंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक हरणार असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सोशल मीडियावरील X वर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

त्यात ते म्हणतात,गेल्या कित्येक वर्षांचा मराठी भाषिकांचा लढा, मागल्या अनेक सरकारांचा केंद्रासोबतचा पत्र व्यवहार, मविआ सरकारच्या काळात केलं गेलेलं दस्तावेजीकरण आणि तमाम मराठी मनांच्या तीव्र इच्छाशक्तीपुढे अखेर केंद्र सरकार झुकलं आणि निवडणुकांच्या तोंडावर का होईना आपल्या मराठी भाषेला 'अभिजात भाषेचा' दर्जा मिळाला!

निवडणूक हरणार असल्यामुळेच...

आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये जगभर पसरलेल्या मराठी भाषिकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. त्याचवेळी केंद्राला एक आठवण,आता महाराष्ट्राचे पळवलेले उद्योगही परत आणा, मराठी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवा आणि मराठी माणसाच्या हक्काची 'गिफ्ट सिटी' मुंबईला परत द्या अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच निवडणूक हरणार असल्यामुळेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याची टीकाही त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.

केंद्रातील मोदी सरकारवर तोंडसुख घेण्याची एकही संधी न सोडणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीदेखील आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर आपल्या भावना सोशल मीडियावर पोस्ट करुन व्यक्त केल्या आहेत.

संजय राऊत म्हणतात, यासाठी अनेक सरकारे,संसदसदस्य,राजकीय पक्ष यांनी पाठपुराव केला. शिवसेनेने ही मागणी सतत लावून धरली.लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे केंद्राला शहाणपण सुचले असल्याचा हल्लाबोलही राऊतांनी केला आहे.

'महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या...'

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो, अशी भावना फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT